माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही असंही सूचक विधान यावेळी त्यांनी केलं. परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

“भाजपाच एक नंबरचा पक्ष”; ग्रामपंचायत निवडणूक निकालावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेरिंग भक्कम आहे”.

पुढे ते म्हणाले की, “कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहेहे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत”.

राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. तसंच वाहतूक नियमांचे पालन करताना नियम आणि संयमाचे सर्वांनी पालन करावे असं आवाहनही केलं.

फडणवीसांचा टोला –
“उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असं सरकार चालवता येत नाही. ट्राफिक सुरुच राहतो सरकारकडे …त्यामुळे त्यासंदर्भात जनता योग्य उत्तर देत असल्याचं मला वाटत आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.