आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला असून गुरुवारी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला. सुमारे साडे सात हजार आदिवासी शेतकरी या मोर्चात सहभागी झाले असून या मोर्चामुळे मुंबई नाका परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत मागण्या मान्य केल्या. त्यास वर्ष होत आले तरी अद्याप काही मागण्या बाकी असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चेकऱ्यांशी वाटाघाटी करण्यासाठी महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये धाव घेतली. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकला नाही. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी किसान सभेचे पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम होते.

अखेर गुरुवारी सकाळी नाशिकमधून मोर्चाला सुरुवात झाली आहे. सुमारे साडे सात हजार आदिवासी शेतकरी बांधव या मोर्चात सामील झाले आहेत.