नैर्ऋत्य मान्सूनचे पुढे सरकणे सुरूच असून, तो शनिवारी मुंबई, पुण्यात दाखल झाला. त्यामुळे मुंबईकरांना दिवसभर ‘पावसाळी आकाशा’चा आनंद घेता आला़.
दुष्काळी पट्टय़ातील अहमदनगर व बीड हे जिल्हेही मान्सूनने व्यापले आहेत. तो आणखी पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. मान्सूनचे आगमन जाहीर केल्याच्या दिवशी पुणे व मुंबईत पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
मान्सून महाराष्ट्रात ४ जून रोजी दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रवासात अडथळे आले होते. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तो दोन दिवस पुढे सरकला नाही. मात्र, हा अडथळा दूर झाल्याने त्याने पुढचे अंतरही कापले. मुंबईच्या बऱ्याचशा भागात शुक्रवारी चांगला पाऊस झाला. पुण्यातही सरी आल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही शहरांत त्याचे आगमन जाहीर करण्यात आल्याचे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले. मान्सूनची उत्तरसीमा सध्या मुंबई, नगर, परभणी या शहरातून जात आहे. तो येत्या दोन-तीन दिवसांत विदर्भातही पोहोचण्याची शक्यता आहे.