केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या २०१६-१८ च्या सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्वेच्या यादीत (एसआरएस) माता मृत्यूदर कमी असणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळवला आहे. गुरूवारी यासंबंधीचे अहवाल प्रकाशित झाला. त्यात अहवालात सातत्य राखले आहे. महाराष्ट्राचा माता मृत्यूदर ५५ वरून ४६ आल्याचे दिसून आले. केंद्रीय नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या या सर्वेच्या यादीत पहिल्या स्थानावर केरळ आहे, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र देशात अग्रेसर असताना आज प्रकाशित झालेल्या एसआरएसच्या अहवालात माता मृत्यूदर कमी असलेल्या राज्यांच्या यादीत या वेळेसही महाराष्ट्राने दुसरा क्रमांक मिळविला आहे. राज्यासाठी ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे. या क्षेत्रात राज्यातील आरोग्य यंत्रणा करीत असलेल्या उपाययोजनांमुळे आणि प्रयत्नांमुळे हे यश असल्याची भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. या यशाबद्दल आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन करत कौतुक केले. राज्यात संस्थात्मक बाळंतपणात वाढ झाली असून त्यामुळे माता मृत्यू रोखणे शक्य होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राचा मातामृत्यू दर ६८ वरून ६१ आणि नंतर ५५ इतका होता. यंदाच्या अहवालात तो दर ४६ असा नोंदविण्यात आला आहे. या यादीत पहिल्या पाच क्रमांकामध्ये केरळ (४३), महाराष्ट्र (४६), तामिळनाडू (६०), तेलंगणा (६३), आंध्रपदेश (७४) या राज्यांचा समावेश आहे. या सर्वेनुसार देशाचा माता मृत्यूदर हा ११३ असून २०१५-१७ च्या तुलनेत त्यात ७.४ टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाने माता मृत्यूदर कमी करण्यासाठी नेमून दिलेल्या शाश्वत विकास ध्येयाची पूर्तता देशातील पाच राज्यांनी केली असून त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.