दरड कोसळण्याच्या घटना

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर  मेंढवण घाट, धानीवरी तसेच डोंगरउतारावर  ठिकठिकाणी दरड कोसळून महामार्गावर पसरली आहे. त्यामुळे हा महामार्ग धोकादायक झाला आहे.  धोकादायक वळणावर वाहनांचा अपघात घडण्याची भीती आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानीवरी, मेंढवण खानिवडा टोलनाका, ढेकाळे, मेंढवन, खिंडीत तर अनेक भागात डोंगर कपारीतून मोठमोठे दरड निखळून महामार्गावर कोसळण्याच्या मार्गावर आहेत. तर पहिल्याच पावसात मेंढवण घाटात दगड गोटे निखळून महामार्गावर आले होते. आयआरबीने देखभाल, दुरुस्ती आणि डागडुजीसाठी ठेकेदार कंपनीला काही नियम, शर्ती आणि अटी लादून दिल्या असल्या तरी त्याचे  पालन मात्र केले जात नाही. या महामार्गावरील मेंढवण, धानीवरी, ढेकाळे  आणि खानिवडे या तीन घाटांदरम्यान तीव्र स्वरूपाची मोठमोठी नागमोडी वळणे असल्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी महामार्गावरील धोकादायक क्षेत्रामधील दरड नियंत्रणासाठी  तातडीची उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी पुढे येत आहे.

महामार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत.  येथे दरड, माती कोसळण्याच्या घटना होत असतात.  त्यामुळे अपघात घडत आहेत. महामार्गावरील अपघातास ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा जबाबदार आहे.

-हरेश मुकणे, माजी उपसरपंच कासा

 आमचे पथक त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतील व जेथे आवश्यक आहे तेथे तात्काळ त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील. अशा काही घटना घडत असल्यास तात्काळ निदर्शनात आणून दिल्यास त्यावर कार्यवाही केली जाईल.

-प्रविण भिंगारे, अधिकारी, आयआरबी