मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये तब्बल २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईहून दापोलीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. माणगावजवळ एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ही बस कळमजे पुलावरून खाली कोसळून हा अपघात झाला.

या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी २० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी २ जणांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, जखमींना तातडीनं जवळच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.