नांदेडमधील वाळकी (बु.) येथे प्रेमी युगुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१८) सकाळी १० वाजता उघडकीस आल्याने मारतळा परिसरात एकच खळबळ उडाली. वाळकी (बु.) ते कापसी रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत दोन मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याची माहिती येथील ग्रामस्‍थांनी उस्माननगर पोलिसांना दिली. पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह कापसी (बु.) येथील आरोग्य केंद्रात पाठविले.

वाळकी ता.लोहा येथील कोमल श्रीकांत कोलते (वय १९) व धनाजी मुकींद कोलते (२२) या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली. पण चार महिन्यांपूर्वी कोमल हिचा विवाह अर्धापूर येथील युवकाशी लावण्यात आला होता तरीही दोघांचे प्रेमसंबध सुरुच होते.

या दोघांच्या प्रेमप्रकरणात भावकीचे नाते अडसर ठरत होते तर दोघांवर प्रचंड दडपण होते. अशातच कोमल ही दिवाळीनिमित्त माहेरी आली होती. त्यातच दोघांनी एकत्र येऊन टोकाचे पाऊल उचलत विहिरीत उडी टाकून आपली जीवनयात्रा संपविली. यावेळी विहिरीतुन मृतदेह काढताना दोंघानी एकमेंकाना घट्ट बांधल्याचे दिसून आले. मृतदेह काढताना दुर्गंधी सुटल्यामुळे अंदाजे दोन दिवसांपूर्वी दोघांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले.

दरम्यान धनाजी हा पदवीचे शिक्षण घेत होता तर कोमलचे बारावी पर्यंतचे शिक्षण झाले होते. दोघांचीही घरं एकमेकांच्या शेजारी असल्यामुळे प्रेमसंबध जुळून आले. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही सुसाईड नोट लिहिली असून त्यात त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार आत्महत्या करत आहोत, या प्रकरणात कोणालाही दोषी धरु नये. आम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाही त्यामुळे जीवनयात्रा संपवित असल्याचे लिहिले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी दिली. यावेळी उस्माननगर पोलिस ठाण्याचे पी.बी.थोरे, मोरे, गायकवाड आदी उपस्थित होते.
—-