देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा या तीन विद्यार्थी आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांना बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यानव्ये (यूएपीए) गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. त्यामुळे राष्ट्रभक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याचं मुद्द्यावरून फ्रान्समधील नेते द गॉल याचं उदाहरण देत मोदी सरकार आणि भाजपाला सुनावलं आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून या राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या मुद्द्यावर भूमिका मांडली असून, सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. “देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणाल? नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केल्याबद्दल आयशा यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. स्वामीवर म्हणजे राजावर जो प्रेम करीत नाही तो राष्ट्रद्रोही या विचारावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आसुड ओढले आहेत. सरकारविरुद्ध, पंतप्रधान, राष्ट्रपतींविरोधात बोलायचे नाही. तसे केले तर सरकार उलथविण्याचा कट रचला म्हणून खटले दाखल होतील. या भीतीवर सर्वोच्च न्यायालयाने उतारा दिला आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा- “मोहन भागवतांनी खुलासा करावा,” राममंदिर जमीन खरेदीतील भ्रष्टाचारावरुन संजय राऊतांचा संताप

“अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला १८ कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

वाद जुनाच !

“देशनिष्ठा की राजनिष्ठा हा वाद सनातन काळापासून सुरूच आहे. आज जे नरेंद्र मोदींवर निष्ठा ठेवत नाहीत ते देशाचे नाहीत असे बोलले जाते. कधी काळी मोदींच्या जागी इंदिरा गांधी होत्या. ‘इंदिरा इज इंडिया, इंदिरा म्हणजेच भारत’ ही घोषणा त्याच राजनिष्ठेतून निर्माण झाली. त्याच इंदिरा गांधींचा पराभव १९७८ साली भारतीय मतदारांनी केला. इंदिरा हरल्या म्हणजे देश हरला, असे मानायचे काय? व्यक्ती येतात व जातात. देश तेथेच असतो. त्याचे कणखर पोलादी नेतृत्व राष्ट्रनिष्ठा घडवत असते. सत्य बोलणारे व राज्यकर्त्यांना आरसा दाखवणारे राष्ट्राचे शत्रू ठरवून तुरुंगात ढकलले जातात. भारतातील विविध तुरुंगांत आज अशा कैद्यांचा आकडा नक्की किती आहे? फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष जनरल द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्या महायुद्ध काळात त्यांच्या सत्यवादाचा कस लागला. हिटलरच्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारार्थ तेव्हाच्या फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली. ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंका फ्रेंच सरकारी तज्ञ पिटत असतानाच द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले. फ्रेंच सरकार व लष्करी अधिकारी द गॉलवर भडकले व तो देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरू केला, पण द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. जर्मन फौजांनी स्वारी केली. मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते?,” असं म्हणत राऊत यांनी देशातील राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

हेही वाचा- ‘शिवप्रसाद’ दिला आहे, ‘शिवभोजन’ थाळी देण्याची वेळ आणू नका; हाणामारीवरुन संजय राऊतांचा भाजपाला इशारा

रुझवेल्ट म्हणत, हिटलर परवडला; पण मित्र म्हणूनदेखील द गॉल नको

“जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की शत्रूला अधिक घातक ठरे. काही व्यक्तीचे रसायनच असे असते की संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्ठा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे. द गॉल यांचा वर्ग तोच. हिटलरच्या सैन्यापुढे सर्व फ्रेंच सेनापतींनी हातपाय गाळले. फ्रेंच सैन्य लाखोंच्या संख्येने प्रतिकार न करता शरण गेले. पण या अवस्थेत द गॉल व त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्य तुकडीने मात्र अत्यंत निकराचा लढा दिला. फ्रेंच सरकारने शरणागती पत्करल्यानंतर ते फ्रान्समधून निसटले व त्यांनी हिटलरविरोधाचा ध्वज फडकवत ठेवला. आता राष्ट्रनिष्ठा म्हणजे काय ते पहा. ”द गॉल हा मानी पुरुष होता. कोणत्याही अवस्थेत ते स्वतः दुय्यम दर्जा स्वीकारायला तयार नसत व आपल्या देशाचा अपमान सहन करीत नसत. परागंदा फ्रेंच सरकारचे नेते असतानाही ते प्रे. रुझवेल्ट, चर्चिल आदी बड्या राष्ट्रांच्या नेत्यांशी बरोबरीच्या नात्याने वागत. फ्रान्सला थोडासा कमीपणा येतो, असे दिसले की ते या बड्यांच्या बैठकीतून ताडताड पाय आपटीत बाहेर पडत! रुझवेल्ट म्हणत, हिटलर परवडला; पण मित्र म्हणूनदेखील द गॉल नको. ते खरेच. गॉल हे राजनिष्ठ, स्वामीनिष्ठ नव्हतेच. ते फक्त राष्ट्रनिष्ठ होते. म्हणून त्यांचा हा लढा होता.”

राज्य अस्थिर कसे होईल ?

“उगवत्या सूर्याचे पूजक हे राजनिष्ठच असतात. राष्ट्र संकटात असतानाही जे फक्त राजनिष्ठ म्हणून वावरतात त्यांच्यापासून राष्ट्राला खरा धोका आहे. आज राष्ट्रद्रोह म्हणजे नक्की काय? ते कुणीच सांगू शकत नाही. कोणत्याही सरकारच्या ‘चुका’ दाखवणे हा काही राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न ठरू शकत नाही. आंदोलनात भाग घेऊन सरकारविरुद्ध घोषणा देणे, त्याबद्दल राजद्रोह, दहशतवादासारखी कलमे लावून बेमुदत तुरुंगात टाकणे या ‘राजनिष्ठेला’च कोणी राष्ट्रनिष्ठा, देशभक्ती समजत असतील तर देश संकटात आहे. अनेकदा शत्रूविरुद्ध लढणे सोपे असते. पण राजनिष्ठांच्या मूर्ख फौजांविरुद्ध मुकाबला करण्याइतकी अवघड गोष्ट नाही. प्रभू श्रीराम १४ वर्षे वनवासात गेले ती राजनिष्ठा होती. अयोध्या राज्यात सुख व शांती नांदावी यासाठी त्यांनी पित्याचा आदेश मानला. ते गृहकलह टाळण्यासाठी घराबाहेर पडले. वडिलांची अडचण समजून ते वनवासी झाले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा निसटता पराभव झाला. जो बायडन हे विजयी झाल्याचे अधिकृतपणे जाहीर होताच ट्रम्प यांचे शेकडो समर्थक अमेरिकेच्या संसदेत घुसून त्यांनी गोंधळ घातला. ही ‘ट्रम्प’ या व्यक्तीच्या प्रती दाखवलेली राजनिष्ठाच होती. त्या दिवशी जगातील सर्वात बुलंद लोकशाहीत राष्ट्रनिष्ठेचाही पराभव झाला. राममंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी करा अशी मागणी करणाऱ्य़ांना राष्ट्रद्रोही ठरवणे ही राजनिष्ठा आहे. महागाई, भ्रष्टाचार, आर्थिक बजबजपुरी, आरोग्यविषयक अराजक माजले असतानाही अशा सरकारची पाठराखण करणारे राजनिष्ठच ठरतात. ते सर्व देशभक्तीत मोडत नाहीत. ‘काळ’कर्ते सांगतात तेच खरे. देशभक्ती व राजनिष्ठा यात देशभक्तीलाच महत्त्व असायला हवे. देशभक्ती ही प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये सदासर्वदा वास्तव्य करीत असली पाहिजे. राजा चांगला असेल त्या वेळेला देशभक्ती आणि राजनिष्ठा यांची एकवाक्यताच असते. कारण त्या वेळी राजावर निष्ठा ठेवल्यानेच देशभक्ती केल्याचे पुण्य प्राप्त होते. परंतु राजा वाईट, मतलबी, व्यापारी वृत्तीचा असेल त्या वेळेला राजनिष्ठेपेक्षा देशभक्तीचे महत्त्व जास्त आहे. फ्रेंचचा लोकनेता ‘द गॉल’प्रमाणे राजा असेल तर राजनिष्ठा व देशनिष्ठा एकाच माळेचे मणी असतात. पण आता ‘द गॉल’ कोठे राहिलेत?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.