केंद्रीय आयुष मंत्रालयाचा निर्णय

दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय अखेर केंद्रीय आयुष मंत्रालयाने घेतला असून पहिला आयुर्वेद दिन २८ ऑक्टोबरला मधुमेहाचे जनजागरण करून साजरा होणार आहे.

गत १५ ते २० वर्षांंपासून याविषयी आयुर्वेद क्षेत्रातील जाणकारांकडून मागणी होत होती. इतर शाखांचा ‘डॉक्टर डे’ मान्यताप्राप्त आहे, पण भारतीय उपचार पध्दती असलेल्या आयुर्वेदाचा कुठलाही दिनविशेष नव्हता. या मागणीचा पाठपुरावा केल्यानंतर आयुषचा स्वतंत्र प्रभाग असणारे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी कोणत्या दिवशी आयुर्वेद दिन साजरा करावा म्हणून मते जाणून घेतली. काहींनी २७ फे ब्रुवारी हा दिवस सुचविला. १९२० साली याच दिवशी नागपूरच्या कांॅग्रेस अधिवेशनात महात्मा गांधी यांनी स्वतंत्र भारताची आरोग्यपध्दती आयुर्वेद ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली होती, पण बहुसंख्य आयुर्वेदप्रेमींनी दिवाळीतील ‘धनोत्रयोदशी’ या दिवसाचाच आग्रह धरल्यावर तो मंजूर करण्यात आला.

आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ.मनोज नेसरी (आयुर्वेद) यांनी यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले आहे. केंद्र शासनाने दरवर्षी ‘धनोत्रयोदशी’ला आयुर्वेद दिन साजरा करण्याचे निश्चित केले असून यंदा प्रमुख कार्यक्रम २८ ऑक्टोबरला नवी दिल्लीत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यंदाचा पहिला राष्ट्रीय आयुर्वेद दिन हा ‘मधुमेह नियंत्रणासाठी आयुर्वेद’ या संकल्पनेवर साजरा केला जाणार आहे. सर्व राज्यातील आयुष संचालनालय, आरोग्य विभाग, आयुर्वेद महाविद्यालये, आयुर्वेद फोर्मसी कंपन्या, तसेच शुभचिंतक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील.

प्रदर्शनी, व्याख्यान, कार्यशाळांचे आयोजन करून हा दिनी मधुमेहावरील उपचारांची माहिती देतील. जिल्हा रुग्णालयांनाही याविषयी राज्याने अवगत करण्याची सूचना या परिपत्रकातून करण्यात आली आहे.

भारतीय संस्कृतीलाच नमन

महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.श्याम भुतडा म्हणाले की, आयुर्वेदप्रेमींसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. भारतीय चिकित्साप्रणाली असणाऱ्या आयुर्वेदाची स्वतंत्र ओळख असल्याने या प्रणालीचा दिनविशेष असावा, अशी अनेक वर्षांंपासून मागणी होती. आयुष मंत्रालयाने योगदिनापाठोपाठ आयुर्वेद दिन साजरा करण्याचा निर्णय घेऊन भारतीय संस्कृतीलाच नमन केले आहे.