आज संबंध महाराष्ट्रात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. काळ कठिण आहे मात्र आपण हरायचं नाही. दुष्काळासंबंधी राज्य सरकारकडून मदत घेवू आणि आपण सर्व मिळून पुन्हा अशी स्थिती येवू नये म्हणून प्रयत्न करू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांमध्ये निर्माण केला. आज सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी व नागेवाडी या गावात जावून शरद पवार यांनी तेथील दुष्काळी भागाची परिस्थिती जाणून घेतली.

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं, संकटाने खचून जायचं नसतं असा आत्मविश्वासही शरद पवार यांनी दुष्काळी भागातील लोकांच्या मनात जागृत केला. यावर्षी पाऊस उशिरा येईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नंतर पाऊस चांगला पडेल असं म्हटले जात आहे. पाऊस चांगला पडेल परंतु त्यासाठी आपण त्यासाठी तयार रहायला हवं. पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल.

पावसाचा थेंब न थेंब वाचण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. पाणी फाऊंडेशन सध्या राज्यभरात चांगले काम करत आहे त्यांना गावकरी मदत करतात हे पाहून समाधान वाटत आहे. हे सुरूच ठेवलं पाहिजे किंबहुना आपण हे वाढवलं पाहिजे असेही शरद पवार म्हणाले.

आज अनेक गावांमध्ये टँकरची मागणी आहे. रेशन कार्डवर धान्य मिळत नाही अशी तक्रार आहे. चारा छावणीऐवजी गावातच चारा डेपोची व्यवस्था व्हावी अशा विविध मागण्या जनता करत आहे. आम्ही या सर्व गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवू. या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत असा ठाम विश्वास शरद पवार यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला.

माढात हरलो असलो तरी ना उमेद झालेलो नाही

माढा मतदार संघात आपण हारलो असलो तरी नाउमेद झालेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जिद्द सोडू नये. चिलेवाडी व नागेवाडी (ता कोरेगाव) व खटाव तालुक्यातील दुष्काळी गावांना भेट देऊन शरद पवार यांनी आज लोकांशी संवाद साधला. साताराच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी दुष्काळी परिस्थिति व उपाययोजना याची माहिती घेऊन खासदार निधीतून दुष्काळी कामांसाठी एक कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.