झारखंड पॅटर्नमुळे देशातील भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी ट्विट करत झारखंड विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाबद्दल झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राजद आघाडीचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, झारखंडमधील जनमताने भगवी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याच्या पॅटर्नला अधोरेखित केलं आहे. याआधी सोमवारीही शरद पवार यांनी झारखंडच्या निकालावर भाष्य केलं होतं. "महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडनंतर आता झारखंडमधूनही भाजपा हद्दपार झाला आहे, भाजपाला लागलेली ही उतरती कळा आता कोणीही थांबवू शकणार नाही," असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविलं होतं. "सत्ता व संपत्तीचा वापर करून राज्ये ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न झारखंड विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरला, जनतेने भाजपला स्वीकारलं नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. Congratulations to @HemantSorenJMM for the stunning electoral victory of the allaince in the Jharkhand polls. The Jharkhand mandate underlines a new pattern which will help the process of reducing the BJP’s saffron footprint across the country. — Sharad Pawar (@PawarSpeaks) December 24, 2019 "झारखंडसह, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यांतून भाजपा सरकारे हद्दपार झाली आहेत. झारखंडमध्ये आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील सत्ता व आर्थिक ताकदीचा वापर करूनही भाजपला तेथील जनतेने जुमानले नाही. या निकालामुळे अन्य राज्यांमध्येही भाजपच्या विरोधात एकत्रित सामना करायला एक विश्वास मिळाला आहे," असंही शरद पवार यांनी म्हटलं होतं. आणखी वाचा - “महाराष्ट्राने केलेली सत्ताबदलाची सुरुवात झारखंडनंतर अन्य राज्यांमध्येही दिसेल” "सत्तेत बसलेल्या लोकांनी शांततेने पावलं टाकायची असतात. परंतु सध्याचं सरकार ज्या पद्धतीने धार्मिक अंतर वाढविण्याचा आणि एकतेला ठेच पोहोचेल अशी पावले टाकताना दिसत आहे," अशी टीका त्यांनी केली होती.