युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा असतानाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी यावरुन शिवसेनेवर टीका केली आहे. संजय राऊत हे पेंग्विनचा राहुल गांधी करतील, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

आदित्य ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी बुधवारी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वपूर्ण विधान केले होते. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी की नाही, याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील. पण राज्यातील जनतेला तरुण चेहऱ्याची आवश्यकता आहे. राज्यातील जनता आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल, असे विधान त्यांनी केले होते.

या विधानाच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी बुधवारी रात्री ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. “संजय राऊत यांच्यासारखी लोकं ‘पेंग्विन’चा राहुल गांधी करणार, देव करो असा काळा दिवस महाराष्ट्रावर कधी येऊ नये”, असे ट्विट त्यांनी केले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नीलेश राणे यांनी नाणार प्रकल्पावरुनही शिवसेना- भाजपा युतीवर टीका केली. युती करण्यासाठी ज्या घाईने प्रकल्प रद्द केला तो फक्त देखावा होता. कोकणातल्या जनतेला कधी कळणार?, असा सवाल त्यांनी विचारला आहे.