लॉकडाउनच्या काळात सर्वत्र रोजगार ठप्प झाला आहे. या काळात गरिबांचे आणि बेघर लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे विशेष कौशल्य नसल्याने एरव्ही देखील ते रोजगारापासून वंचित असतात. ही अडचण लक्षात घेता सध्याच्या लॉकडाउनमुळे उपलब्ध असलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची एक कल्पना नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुचली आहे. त्यानुसार, नागपूर महापालिकेच्यावतीनं शहरातील गरीब आणि बेघर लोकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

या योजनेबाबत माहिती देताना आयुक्त मुंढे म्हणाले, “लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर आम्ही रस्त्यावरील बेघर आणि भिकारी लोकांना शेल्टर होम्समध्ये दाखल केलं आहे. या ठिकाणी त्यांच्या जेवणा-खाण्याची सोय करण्यात आली आहे. तसंच आरोग्य तपासणी आणि इतर सुविधाही त्यांना इथे देण्यात येत आहेत. आता त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमही आम्ही सुरु केला आहे. नागपूर शहर भिकारी निर्मुलन करण्याचे दीर्घकालिन ध्येय डोळ्यासमोर हा कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. यासाठी रस्त्यावर राहणाऱ्या बेघर लोकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवले जाणार आहे.

आणखी वाचा- संवेदनशीलता..! आईच्या उत्तरकार्यचे पंचवीस हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

पूर्णपणे त्यांचं रुपडंच पालटून टाकलं

नागपूर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी म्हणाले, “सध्या नागपूरमध्ये १९ शेल्टर होम्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये १५०० ते २००० लोक राहतात. इथं त्यांना दैनंदिन गरजा पुरवण्याबरोबरच आम्ही पूर्णपणे त्यांचं रुपडंही पालटून टाकलं आहे. आता त्यांना आम्ही कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देत आहोत. यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर ते स्वतः कमाऊ शकतील आणि आपलं पोट भरतील.”