कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या उत्तरेला असलेल्या दानोळी गावात विजेच्या तारेमुळे विजेचा धक्का लागून एका दाम्पत्याचा मंगळवारी मृत्यू झाला. ऐन दसऱ्याच्या दिवशी सकाळी ही दुर्घटना घडल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दानोळी गावात राहणाऱ्या अंजना घाडगे या नेहमीप्रमाणे घरावर कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या होत्या. पण कपडे वाळत घालत असताना तारेमधील वीजप्रवाहामुळे त्यांना विजेचा धक्का बसला. त्यांच्या पतीसमोरच ही घटना घडल्यामुळे ते अंजना यांना बाजूला काढण्यासाठी पुढे गेले. पण त्यांनाही विजेचा धक्का लागल्याने या दोघांचा मृत्यू झाला. जवळच्या लोकांनी या दोघांना लगेचच स्थानिक रुग्णालयात नेले. पण तिथे उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
कपडे वाळत घालणाऱ्या तारेचा वीजवाहिनीला स्पर्श झालेला असल्याने त्यातून वीजप्रवाह सुरू असल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.