एखाद्या व्यक्तीला हिणवताना काय रे अलिबागवरुन आला आहेस का ? या वाक्याचा अनेकदा वापर केला जातो. काही चित्रपट, मालिकांमध्येही हा डायलॉग ऐकायला मिळतो. हा डायलॉग किंवा वाक्य वापरत अलिबागकरांचा अपमान का केला जात आहे ? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबागचे रहिवासी असणाऱ्या राजेंद्र ठाकूर यांनी ही याचिका केली आहे. राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेतून सीबीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केली आहे. तसंच चित्रपट आणि मालिकांमध्ये असा डायलॉग किंवा उल्लेख असल्यास सेन्सॉर बोर्डाने तो काढून टाकावा असा आदेश देण्याचीही मागणी करण्यात आली. अलिबाग म्हणजे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ असून या डायलॉगमुळे विनाकारण अलिबागची बदनामी होत असल्याचं राजेंद्र ठाकूर यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली असता दोन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे.