काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीमुळे काँग्रेसमधून बाहेर पडाव लागत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हर्षवर्धन पाटील यांचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे. “माझा आणि हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय वाद सुरू आहे. पण आम्ही शब्द पाळला नाही, हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. इंदापूरच्या जागेचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार होता. त्यापूर्वीच त्यांनी त्यांचा निर्णय घेतला”, असा आरोप पवार यांनी केला आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपात इंदापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नाराज झाले होते. काही दिवसांपूर्वी इंदापूरमध्ये संकल्प मेळावा घेऊन त्यांनी आपली नाराजी कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली होती. “इंदापूरकरांवर खूप अन्याय झाला आहे. बारामतीने कायम हीनतेची वागणूक दिली; मात्र आता आपण सहन करायचं नाही तर लढायचं”, अशा शब्दात पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. अखेर हर्षवर्धन पाटील बुधवारी (११ सप्टेंबर) भाजपात दाखल झाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांनी पक्षावर केलेले आरोप फेटाळले आहेत. बारामतीत बोलताना अजित पवार म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाची चर्चा वरिष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे. इंदापूरला सध्या राष्ट्रवादीचे भरणे हे आमदार आहेत. तसेच त्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीने पाटील कोणताही शब्द दिला नव्हता. माझा आणि हर्षवर्धन पाटील यांचा राजकीय वाद सुरू आहे. पण आम्ही शब्द पाळला नाही, हा त्यांचा आरोप चुकीचा आहे. इंदापूरच्या जागेचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार होता. त्यापूर्वीच त्यांनी निर्णय घेतला होता आणि आता आमच्यावर पावती फाडत आहेत”, असे पवार म्हणाले.

“हर्षवर्धन पाटील पवार कुटुंबांवर विनाकारण खोटे आरोप करीत आहे. जाधव यांनी इंदापूरमध्ये घेतलेल्या सभेनंतर मी त्यांना ५० ते ५५ वेळा फोन केला. माझ्या पीएसोबत त्यांच्या पुण्यातील घरीही जाऊन आलो. ते भेटले नाहीत आणि आता खोटे आरोप करत आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो मान्य असेल असा शब्द पाटील यांनी दिला होता”, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.