|| विजय राऊत पालघर जिल्ह्यात निधीचा अभाव; अनेक घरकुल लाभार्थ्यांनातिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा कासा : अनुसूचित जातीतील घरकुल लाभाथ्र्यांची निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, त्यांना राहायला हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने मोठा गाजावाजा करत रमाई आवास घरकुल योजना सुरू केली. परंतु राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच निधीच्या अभावामुळे जिल्ह्यात रमाई आवास घरकुल योजनेची घरकुले रखडली असून या घरकुल योजनेलाच घरघर लागली असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा-२२, जव्हार-१, डहाणू- ६, पालघर- ३०, तलासरी- १, वाडा- ९ अशा ६ तालुक्यांत वर्ष २०१८ ते २०१९ मध्ये ६९ घरकुले मंजूर करण्यात आली. या लाभार्थ्यांना दुसरा हप्ता मिळाला, परंतु निधीअभावी तिसरा हप्ता मिळाला नसल्याने अनेक लाभार्थ्यांची घरकुले अर्धवट राहिली. काही लाभाथ्र्यांनी कशीबशी ही घरकुले बांधली, परंतु त्यांना अद्याप तिसरा हप्ता मिळालेला नाही. यामुळे ही बाब प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त होत आहे. निवारा होण्यासाठी बेघर असलेल्या नागरिकांसाठी हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन तरतूद करते, मात्र अंमलबजावणी होत नसल्याने या हक्काच्या घरकुलांची प्रतिक्षा करावी लागत आहे. निधी उपलब्ध न झाल्याने अर्धवट बांधकाम झालेल्या या घरकुल लाभार्थ्यांनाभर पावसाळ्यात उघड्यावर राहावे लागले आणि आता मात्र थंडीतही कुडकुडत राहावे लागत आहे. आजउद्या हप्ता जमा होईल या आशेने वारंवार पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवून त्यांच्या पदरी निराशाच पडत असून ७ ते ८ महिन्यांचा कालावधी उलटूनही घरकुलांचे पैसे मिळत नसल्याने लाभार्थी आता मेटाकुटीला आले आहेत. याबाबत संबंधितांना विचारणा केली असताना कोविड-१९ च्या पाश्र्वाभूमीवर राज्यातील रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपला आहे. राज्यात घरकुलाचा निधी उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येईल असे शासन स्तरावर सांगण्यात येत आहे. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलणे झाले असून निधीसाठी पाठपुरावा करणार आहे. - सुनील भुसारा, आमदार, विक्रमगड विधानसभा आम्हाला पावसाळ्यात उघड्यावर राहावे लागले आहे. आमचे घरकुल अपूर्ण आहे. लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्या. - सुभाष गांगुर्डे, लाभार्थी, हिरवे