राज्यात करोनाचं संकट वाढू लागलं आहे. त्यातच उन्हाळ्याचाही कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. मात्र, एकीकडे उन्हाचा कडाका असताना दुसरीकडे साताऱ्यामध्ये आज दुपारी तुफान गारांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. साताऱ्याच्या उत्तर कोरेगाव भागामध्ये वाठार स्टेशन परिसरात अवकाळी पावसामुळी आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या भागातल्या अनेक गावांमध्ये दुपारी २ च्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यात जवळपास तासभर गारा कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीचे, आंब्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान! आज दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) भागात सर्वत्र गारांचा पाऊस झाला. या पावसाने परिसरातील शेती रस्त्यांवर गारांचा मोठा थरच साठला होता. यामुळे शेतीचे, आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. सातारा जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक भागात अवकाळी पाऊस होत आहे. उत्तर कोरेगाव परिसरातील वाठार स्टेशन, डिस्कळ, पिंपोडे बुद्रुक, जाधव वाडी, फडतरवाडी, विखळे, सोळशी, सोनके आदी परिसरात एक तास गारांचा मुसळधार पाऊस झाला. यावेळी झालेल्या ढगफुटीने शेतात रस्त्यावर गारांची चादर पसरली होती. आज दुपारी वाई शहरासह तालुक्यातील इतर काही भागातही मुसळधार पाऊस झाला. तसेच पुणे बंगळुरू महामार्ग, पाचगणी, महाबळेश्वर आदी भागातही हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, उन्हाचा कडाका जाणवत असताना अचानक आलेल्या पावसामुळे सामान्यांना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही चिंतेची बाब ठरली आहे