राज्य शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकांची बैठक घेतली. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या. तर, काही बंदच होत्या. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर यांनी शाळा सुरू वा बंदचा संभ्रम दूर करावा, अशा सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाने सोमवारी (ता. १३) जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्ह्यात बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेक पालक मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संभ्रमात आहेत. अशास्थितीत जिल्ह्यातील काही शाळा सुरू झाल्या. तर, अनेक शाळा बंदच आहेत. त्यामुळे अनेक पालकांत आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना निर्माण झाली होती. पालकांमधील हा संभ्रम दूर करण्यात यावा, यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद किंवा सुरू करण्याबाबतचा निर्णय तातडीने जाहीर करावा, असे स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार शिक्षण विभागाने यासर्व परिस्थितीची माहिती जिल्हा प्रशासनाला अवगत करून दिली. त्यानंतर सोमवारी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस ३१ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. आणखी वाचा- दिलासादायक बातमी… चंद्रपूर जिल्ह्यात १०० बाधित करोनातून बरे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आवश्यक शैक्षणिक कामासाठी प्रत्यक्ष शाळा, विद्यालय, महाविद्यालय मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहण्यास मुभा दिली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा टप्याटप्याने सुरू करण्याबाबत स्थानिक परिस्थितीचा विचार करून, स्थानिक पातळीवरील प्रशासन, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती यांनी एकत्रित निर्णय घेऊन शासन परिपत्रकातील वेळापत्रकानुसार तसेच आदेशाचे काटेकोरपणे पालन करून सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचेही या पत्रात नमूद केले आहे. खासदार धानोरकर यांनी पुढाकार घेऊन शाळांबाबतचा संभ्रम दूर केल्याबद्दल पालकांकडून आभार मानले जात आहे.