कातिल सिद्दीकी खून प्रकरणी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांची शिवाजीनगर येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 8 जून 2012 रोजी येरवडा कारागृहातील अंडासेलमध्ये नाडीने गळा आवळून कातिल सिद्दीकीचा खून करण्यात आला होता. खून, खंडणी उकळणे, दरोडे, दहशत माजविण्याच्या गुन्ह्य़ात शरद मोहोळ टोळीचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. कारागृहात असतानाही मोहोळच्या नावाने खंडणी मागितल्याची प्रकरणे पुढे आली आहेत. संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकी (वय २७) याचा येरवडा कारागृहातील अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या अंडा सेलमध्ये पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला होता. त्यात मोहोळ याच्यासह त्याचा साथीदार अलोक भालेराव यांना आरोपी करण्यात आले होते. यानंतर अनेकांची उलटतपासणी करण्यात आली होती. पुराव्यांची तपासणी केल्यानंतर बुधवारी शिवाजीनगर न्यायालयाने मोहोळ आणि भालेराव या दोघांनाही निर्दोष मुक्त केले. सबळ पुराव्यांअभावी त्यांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काय आहे शरद मोहोळची पार्श्वभूमी पुण्यात मारणे आणि मोहोळ यांच्यात टोळीयुद्ध व्हायचे. यातूनच 2006 मध्ये मारणे गटाने संदीप मोहोळचा खून केला. त्यानंतर शरद मोहोळ याने संदीप मोहोळची जागा घेतली. 2010 मध्ये त्याने किशोर मारणेचा खून केला. त्यानंतर 2011 नोव्हेंबरमध्ये सरपंच शंकरराव धिंडले यांचे अपहरण करून 45 लाखांची खंडणी घेतली होती. त्यानंतर खंडणीविरोधी पथकाने मोहोळ आणि भालेराव या दोघांनाही अटक केली होची. मोहोळवर खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण यासारखे गंभीर स्वरुपाचे आठ गुन्हे दाखल आहेत.