राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.

दरम्यान या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. “आरोपांच्या मूळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं. सत्य समजल्याशिवाय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात अर्थ नाही. आम्ही योग्य होतो, हे सिद्ध झालय” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मा यांनी मागे घेतली बलात्काराची तक्रार

काही दिवसांपूर्वी रेणू शर्मा या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करुन राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण आता रेणू शर्माने तक्रार मागे घेतली आहे.

आणखी वाचा- “बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी तात्काळ कारवाई करा”

कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितलं. काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असं ट्विट केलं होतं. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.

काय आहे प्रकरण?
धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता. रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीनं मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती.