पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील वर्धा येथील पहिल्याच प्रचारसभेत हिंदुत्वाचे कार्ड खेळले. भाजपासोबत युती केलेल्या शिवसेनेने मोदींच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. शिवसेनेचा श्वास व आत्मा ‘हिंदुत्व’ हाच असल्याने आम्ही मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. २०१४ सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला व २०१९ सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल अशा विश्वास या लेखात व्यक्त करण्यात आला आहे.

काँग्रेसवर टीका करताना हिंदू दहशतवाद या प्रचारामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना बळ मिळाले असे लेखात म्हटले आहे. तुकाराम ओंबळे यांनी हौतात्म्य पत्करून या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले म्हणून ‘26/11’ आणि त्यातील पाकिस्तानचा हात जगासमोर उघड झाला. नाहीतर या हल्ल्यातील पाकिस्तान कनेक्शन पडद्याआडच राहिले असते आणि कदाचित त्यालाही ‘हिंदू दहशतवादा’चे लेबल चिकटवले गेले असते असे अग्रलेखात म्हटले आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात
– हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये. 2014 सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला व 2019 सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल. त्या दृष्टीने वर्धा येथे प्रचारसभांचा मुहूर्त करताना पंतप्रधान मोदी यांनी जे हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले ते महत्त्वाचेच ठरते. शिवसेनेचा श्वास व आत्मा ‘हिंदुत्व’ हाच असल्याने आम्ही मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत.

नरेंद्र मोदी यांनी वर्ध्यातील पहिल्या सभेत काही मुद्यांवर जोर दिला आहे. त्यात हिंदुत्वाचा मुद्दा आघाडीवर आला आहे. मोदी यांनी प्रचारसभांचा धूमधडाका सुरू केला आहे. त्याचा मुहूर्त महाराष्ट्राच्या भूमीतून केला. महाराष्ट्राच्या ‘सेवाग्राम’ म्हणजे गांधीभूमीतून मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी यांनी सेवाग्राममधून हिंदुत्वाची ठिणगी टाकली. काँग्रेसने जगभरात हिंदूंना बदनाम केले. हिंदूंची नाचक्की केली, असे मोदी यांनी ठणकावून सांगितले. पाच हजार वर्षांच्या आपल्या संस्कृतीवर हिंदू दहशतवाद हा कलंक काँग्रेसने लावला. हिंदूंना दहशतवादी म्हणून कलंकित करणाऱ्या काँग्रेसला आपण माफ करणार का? असा सवाल मोदी यांनी केला व 2019 च्या रणांगणात हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले. मोदी यांच्या सेवाग्राममधील सभेस गर्दी कमी होती व सभेचे मैदान चाळीस टक्के रिकामे होते, अशी काव काव काहींनी केली; पण वर्ध्यातील उष्णतेचा चढलेला पारा पाहता त्या तप्त ज्वाळांतही मैदान साठ टक्के गच्च भरले हे महत्त्वाचे आहे.

– म्हणजे विरोधकांनी ‘गर्दी’चे कारण देत अपशकून करण्याचा प्रयत्न केला, पण ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे या वादासारखाच हा विषय आहे. मैदान चाळीस टक्के रिकामे नव्हते, तर साठ टक्के भरले याचे दुःख विरोधकांना झाले आहे. पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा पुकार केला व हिंदुत्व राजकारणातून टाळता येणार नाही हे दाखवून दिले. केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्द प्रचलित झाले. हिंदू दहशतवाद्यांनी समझोता एक्सप्रेस व मालेगावात बॉम्बस्फोट घडविल्याचा आरोप फक्त झाला नाही, तर बनावट पुरावे उभे करून खटले दाखल झाले. स्वामी असिमानंद, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना अटक करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले. आता समझोता एक्सप्रेस खटल्यातून स्वामी असिमानंद यांना सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. हिंदू दहशतवाद या प्रचारामुळे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना बळ मिळाले. हिंदुस्थानात जे दहशतवादी हल्ले होत आहेत त्यामागे पाकिस्तान नसून तुमच्याच देशातील हिंदू कट्टरपंथी असल्याची भाषा पाकडे करू लागले, हा प्रकार भयंकर होता. 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेले करकरे, कामटे, साळसकर आदी पोलीस अधिकारी हे अतिरेक्यांनी मारले नाहीत, तर ते हिंदू दहशतवादाचे बळी ठरल्याची बकवासही काँग्रेस पुढाऱ्यांनी केली होती. हे देशाचे दुर्दैवच होते.

– या सगळय़ा प्रकाराने हिंदुस्थानची जगात नाचक्की झाली. पोलीस तुकाराम ओंबळे यांनी हौतात्म्य पत्करून या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडले म्हणून ‘26/11’ आणि त्यातील पाकिस्तानचा हात जगासमोर उघड झाला. नाहीतर या हल्ल्यातील पाकिस्तान कनेक्शन पडद्याआडच राहिले असते आणि कदाचित त्यालाही ‘हिंदू दहशतवादा’चे लेबल चिकटवले गेले असते. इंग्रजांच्या इतिहासातही हिंदू दहशतवादाची नोंद नाही, असे श्री. मोदी यांनी सेवाग्रामच्या सभेत सांगितले. कश्मीरातील नेते सरळ सरळ देशविरोधी भूमिका घेत आहेत. मेहबुबा मुफ्ती यांनी धमकी दिली आहे की, ‘35-अ’ कलम रद्द झाले तर आपण हिंदुस्थानशी नाते तोडू. ओमर अब्दुल्ला यांनी घोषणा केली आहे की, कश्मीरला स्वतंत्र पंतप्रधान म्हणजे ‘वजीरे-आझम’ असायला हवेत. म्हणजे या मंडळींनी सरळ सरळ हिंदुस्थानची घटना व कायदे मंडळालाच आव्हान दिले आहे. या विचारांची कीड वेळीच पायाखाली चिरडली नाही तर कश्मीर कायमचा अशांत व अस्थिर राहील. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये. 2014 सालीही मोदी यांच्या मागे ‘हिंदू’ समाज उभा राहिला व 2019 सालीही हिंदू समाज मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीस विजयाच्या शिखरावर नेईल. त्या दृष्टीने वर्धा येथे प्रचारसभांचा मुहूर्त करताना पंतप्रधान मोदी यांनी जे हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले ते महत्त्वाचेच ठरते. शिवसेनेचा श्वास व आत्मा ‘हिंदुत्व’ हाच असल्याने आम्ही मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत करीत आहोत.