विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना-भाजपा युती तटली आणि शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचं एकत्रित सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडीच्या निमित्ताने राज्यात नवं राजकीय समीकरण जुळून आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या एका उद्देशाने भाजपासोबत गेलो होतो त्यात पोकळपणा असल्याची जाणीव झाली, म्हणून मी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. “ध्यानीमनी नसता मी मुख्यमंत्री झालो. नाहीतर माझ्या स्वप्नातही ही संधी मला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण आता माझ्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आलीच आहे तर माझ्या जनतेची स्वप्नं पूर्ण करणारच,” असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केलं तर? असं विचारण्यात आलं असता उद्धव ठाकरे यांनी करुन बघा असं आव्हान देत मी भाकीत थोडीच करु शकतो असं म्हटलं आहे. “असा कोणाताही विरोधी पक्षातील नेता दाखवा जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेला आहे, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला आहे. मग तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाही आहे, ज्यासाठी तुम्ही दुसऱ्या पक्षात जात आहात? अशी फोडाफोडी झाल्यानंतर वापरा आणि फेकून द्या ही निती सर्वांनी वापरल्याची अनेक उदाहरणं आहेत. हे आपल्याकडचं राजकारण आहे. हा एक संदेश आहे की, दुसऱ्या पक्षाने आपला वापर करुन फेकून देऊ द्यायचं की आपण आपल्या पक्षात ठामपणे काम करायचं,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “एखादी व्यक्ती किंवा नेता आपल्यावर अन्याय करत असेल तर त्या पक्षाचा त्याग करुन दुसऱ्याची पालखी वाहणार आहात का? तुम्ही पालखीत बसणार आहात का? तुम्हाला पालखीत बसवण्यास कोणी तयार आहे का? मी कोणाच्याही उज्ज्वल भविष्याआड येऊ शकत नाही, येत नाही. जर तुम्हाला दुसऱ्या पक्षात पालखीत बसण्याचं स्थान मिळत असेल तर नक्की जा. पण पालखीचे भोई होणं एवढंच तुम्हाला समाधान हवं आहे का? पालखीचं ओझं वाहायचं असेल तर जाऊ शकता,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. “किती असे पक्षांतर केलेले नेते आहेत जे दुसऱ्या पक्षात जाऊन मोठे झाले आहेत. एका ठराविक काळानंतर त्यांची कारकिर्द संपते,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.