|| निखिल मेस्त्री ग्राहकांमध्ये नाराजी; महावितरणकडून खासगी मीटर आणण्याचा तगादा पालघर : पालघर जिल्ह्यातील महावितरण विभागाकडे वीज मीटर नसल्याने जिल्ह्यात वीज मीटरचा तुटवडा जाणवू लागला आहे. हजारो ग्राहकांनी नवीन मीटरसाठी पैसे भरल्यानंतरही अनेक महिन्यांपासून हे वीज ग्राहक मीटरच्या प्रतीक्षेत आहेत. काही ग्राहकांना खासगी मीटर आणण्याचा तगादा महावितरणमार्फत लावला जात आहे. करोना स्थितीच्या आधी जिल्ह्यात वीज मीटरचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात होते. मात्र, अचानकपणे हे मीटर संपले व त्यानंतर आतापर्यंत पालघर जिल्ह्यात वीज मीटरचा तुटवडा जाणवू लागल्याने नवीन मीटरच्या प्रतीक्षेत असलेल्या वीज ग्राहकांमध्ये नाराजी पसरली असून संतापाचे वातावरण आहे. हे वीज ग्राहक अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत बोटे मोडत आहेत. पालघर जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण यामुळे वीज मीटरची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरण असमर्थ ठरत आहे. पालघर जिल्ह्यात वीस हजारांहून अधिक नागरिक वीज मीटरच्या प्रतीक्षेत आहेत. औद्योगिक, वाणिज्य व घरगुती वापरासाठीचे मीटरची मागणी महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली असली तरी अलीकडील काळात केवळ दोन हजार मीटरची पूर्तता करण्यात आलेली आहे. उर्वरित मीटर अजूनपर्यंत आलेलीच नाहीत. कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून आलेली मागणी अधीक्षक अभियंता कार्यालयाकडे करण्यात आली असली तरी महावितरणच्या कल्याण मंडळामार्फत पुरेसे वीज मीटर पालघर जिल्ह्यात उपलब्ध झाले नसल्याचे समजते. त्यामुळे नवीन वीज मीटरच्या प्रतीक्षेत असलेल्या वीज ग्राहकांच्या अडचणी वाढत आहे. अलीकडच्या काळात महावितरण विभागाने परिपत्रक काढून वीज ग्राहकांनी खासगी व मान्यताप्राप्त दुकानदारांकडून वीज मीटर घेण्याची मागणी केली होती. या वीज मीटरच्या पैशांच्या मोबदल्यात वीज ग्राहकांच्या वीज बिलात हे देयक देण्यात येणार होते. मात्र ग्राहकांनी याला प्रतिसाद न दिल्यामुळे महावितरणकडील वीज मीटरची मागणी दिवसेंदिवस वाढत गेली. याउलट मीटरचा तुटवडा असल्याने ही मागणी परिपूर्ण करण्यात महावितरण अयशस्वी ठरत आहे. याचा मोठा फटका महावितरणाच्या महसुलावर बसत आहे. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक बिघाड असलेले मीटर बसवणे प्रलंबित आहे. नव्याने आलेले मीटर या बिघाड झालेल्या मीटरच्या जागी बसवणे अपेक्षित असताना मीटरचा तुटवडा असल्यामुळे महावितरण समोर ही मीटर बदलण्याचे मोठे आव्हान आहे. याचबरोबरीने पालघर जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक नागरिकांनी नवीन मीटर बसवण्यासाठीचे पैसेही महावितरणकडे अदा केलेले आहेत. त्यानंतरही त्यांना अजूनपर्यंत मीटर प्राप्त झाले नसल्याने त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे. ‘ग्राहकांनी मीटर खरेदी करावे’ ज्या वीज ग्राहकांना नवीन मीटरची आवश्यकता आहे. त्यांनी मान्यताप्राप्त दुकानदाराकडून मान्यता असलेले वीज मीटर खरेदी करावे. त्याचे देयक महावितरण कार्यालयाकडे सादर केल्यास त्या मीटरची देयक वीज बिलाद्वारे ग्राहकांना वळते केले जातील असे परिपत्रक असल्याची माहिती अधीक्षक अभियंता यांनी दिली आहे. ज्या वीज ग्राहकांच्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड आहे व बिघडानंतरही मीटर बदलले गेलेले नसेल अशा ग्राहकांना मीटर नवीन बसवून देईपर्यंत वीज वापराच्या सरासरी वीज देयक देण्यात येत आहे. नसल्यास महावितरण कार्यालयात तशी लेखी तक्रार दाखल केल्यास सरासरी वीज देयक नवीन मीटर देईपर्यंत देण्याची तरतूद आहे. वीज मीटरचा तुटवडा असला तरी मागणीनुसार कमी-अधिक प्रमाणात मीटर उपलब्ध होत असून ते ग्राहकांना दिले जात आहेत. - किरण नगावकर, अधीक्षक अभियंता, पालघर मंडळ