टाळेबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्य़ातील टाळेबंदीच्या नियमांमध्ये आजपासून (२२ मेपासून ) शिथिलता देण्यात आली असून सुमारे दोन महिन्यांच्या खंडानंतर जिल्हाअंतर्गत एसटीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी या संदर्भात जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हंतर्गत बससेवा तसेच रिक्षा आणि केशकर्तनालयांना विशिष्ट अटींवर परवानगी देण्यात आली आहे. तीनचाकी वाहन किंवा रिक्षामध्ये १ वाहनचालक व २ प्रवासी अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे. प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्य़ात बस सेवा सुरु करता येणार आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्य़ात ३२ एसटी गाडय़ा फेऱ्यांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यात रत्नागिरी तालुक्यातून पाच गाडय़ा सुटणार आहेत. क्रीडा संकुल, मैदाने आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागांच्या ठिकाणी शारीरिक अंतर ठेवून वैयक्तिक सरावास परवानगी दिली आहे. मात्र समूह आणि प्रेक्षक जमा होतील असे क्रीडाप्रकार आयोजित करण्यास बंदी कायम राहणार आहे . शहर व जिल्ह्य़ातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत सुरू ठेवता येतील. मात्र दुकानांच्या ठिकाणी प्रत्येक ग्राहकांमध्ये किमान ६ फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक असेल . तसेच दुकानासमोर एकाच वेळी ५ पेक्षा अधिक व्यक्ती असणार नाहीत. असे बंधन राहणार आहे. अत्यावश्यक सेवा व त्याव्यतिरिक्त इतर सेवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून पुरवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर कुरियर आणि पोस्टाच्या सेवाही सुरू राहणार आहेत. जिल्ह्य़ातील केश कर्तनालये, सलून, स्पा आदी दुकाने शारीरिक अंतर ठेवून करोना विषाणूंचा प्रादूर्भाव होणार नाही. अशा प्रकारची दक्षता घेऊन सुरू ठेवता येतील. अंत्यविधी व अंत्ययात्रेच्या वेळी शारीरिक अंतर ठेवून कमाल ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे . शासकीय कार्यालयात १००% उपस्थिती सर्व शासकीय कार्यालयांमध्ये १०० टक्के उपस्थितीत सुरु ठेवण्याचा आदेश दिला आहे. मात्र या कार्यालयांमध्ये मास्क व सॅनिटायझरच्या वापरासह शारीरिक अंतराचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे .