ताहाराबाद-पिंपळनेर रस्त्यावर बुधवारी रात्री दोन मालमोटारींमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताहाराबाद-पिंपळनेर रस्त्यावर बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्गावरून दोन्ही मालमोटारी भरधाव चालल्या होत्या. समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने त्यांची धडक झाली. त्यात एकनाथ धुडा वेताळ (४२, मालेगाव), यलप्पा अयप्पा कट्टीमणी (४०, नाशिक) आणि योगेश सुरेश हिरे (३०, मालेगाव) हे तीन जण ठार झाले. त्यातील दोघे मालमोटारीचे चालक असून एक क्लिनर आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जायखेडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वी तिघांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.