प्रस्तावित दिल्ली-मुंबई महाकाय औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पामुळे उद्भवणाऱ्या शेती, पाणी, पर्यावरण, शहरीकरणावरील गंभीर परिणामांची चर्चा करण्यासाठी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता शहरातील राष्ट्रभाषा भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. लोकशाही प्रक्रियेत विकास साधण्याचे इतर असंख्य पर्याय कार्यक्षमपणे जोखण्याआधीच कॉरिडॉर प्रकल्पाशिवाय पर्यायच नाही, असे चित्र जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे. २०टक्के उच्चभ्रूंचा चंगळवाद जोपासण्यासाठी ८०टक्के सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत आहे. बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां मेधा पाटकर मार्गदर्शन करणार आहेत. धुळे जिल्ह्यातूनही प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पाचा महत्त्वपूर्ण टप्पा जाहीर होण्याविषयीची चर्चा आहे. प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे धुळे जिल्हय़ातील शेती, पाणी, जंगले आदी मोठय़ा प्रमाणावर बाधित होतील. तसेच शहरातील नागरी सुविधांवर प्रचंड ताण पडून त्या आणखीन विक्राळ स्वरूप धारण करतील. या सर्व प्रश्नांची चर्चा करण्यासाठी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक शाम पाटील, अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी, सचिन सोनवणे यांनी केले आहे.