कसनासूर येथे लग्नाला जात असल्याचे घरी सांगून सायंकाळी सात वाजता गट्टेपल्ली येथून निघालेले आठ तरुण लग्नस्थळी न पोहोचता चकमकीच्या स्थळी इंद्रावती नदीच्या पात्रात कसे पोहचले हा संभ्रम आहे. कसनासूर व गटेपल्ली या दोन्ही गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला असता, काहींनी साईनाथ सोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली तर काहींनी पोलिसांकडेही बोट दाखविले. त्यामुळे त्या आठ आदिवासी तरुणांच्या मृत्यूबाबत संभ्रम कायम आहे.

२२ एप्रिल रोजी बोरिया गावालगत इंद्रावती नदीच्या पात्रात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ३४ तर राजाराम खांदला चकमकीत सहा असे एकूण ४० नक्षलवादी ठार झाले होते. नदीपात्रात मारलेल्या ३४ नक्षलवाद्यांमध्ये गटेपल्ली गावातील महेश आत्राम (२०), मंगेश मडावी (१७), इरपा मडावी (१९),रासो पोया मडावी (२१), बुज्जी उसेंडी (१६), रासो मडावी (१५), नुसे पेडू मडावी (१७), अनिता देव गावडे (१६) हे आठ आदिवासी तरुण ठार झाल्याचा संशय आहे. या पाश्र्वभूमीवर कसनासूर, गटेपल्ली गावाला भेट देऊन तेथील गावकरी, चकमकीत ठार झालेल्यांच्या नातेवाईकांनी मित्रांशी संवाद साधून वस्तुस्थिती जाणून घेतली.

मुख्य मार्गावरील ताडगावपासून ५ किमी अंतरावर कसनासूर या जंगलातील २०० लोकवस्तीचे गाव आहे. घटनास्थळ या गावापासून ५ किमी अंतरावर आहे. सरपंच मडावी यांच्या घरी उपस्थित गावकऱ्यांनी २१ व २२ एप्रिलला या दोन दिवसांतील घडामोडी सांगितल्या. सोमा मडावी यांच्या घरी २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लग्न होते. आदिवासींमध्ये लग्नाच्या एक दिवस आधी नाचगाण्यांचा कार्यक्रम असतो. त्यानुसार २१ एप्रिल रोजी या कार्यक्रमाला भामरागड, ताडगाव, कांदोळी, गट्टेपल्ली व आजूबाजूच्या गावांतील मुले-मुली आलेली होती. मात्र चकमकीत मारल्या गेलेल्यांपैकी एकही जण या कार्यक्रमाला किंवा लग्नाला हजर नव्हता, असे सांगितले जाते. गटेपल्ली येथील रहिवासी व सोमा मडावी यांचे नातेवाईक गोंगलू गावडे, तिची आत्या तुलसीबाई गावडे यांनीही या आठ जणांना लग्नस्थळी बघितले नाही. विवाहाच्या दिवशी सर्व जण धावपळीत असताना पाहुणे इंद्रावतीवर आंघोळीसाठी गेले. तेव्हा सकाळी साडेआठच्या सुमारास गोळीबार व स्फोटाचे आवाज येऊ लागले. दोन ते अडीच तास हा प्रकार सुरू होता. काही तासांनंतर नदीकाठी चकमक झाली व त्यात १६ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती गावात आली. लग्नात सर्व जण व्यस्त असल्यामुळे या चकमकीकडे कोणाचे लक्ष नव्हते. मात्र चकमकीच्या एक दिवस अगोदर म्हणजे २१ एप्रिलच्या सकाळी दोन नक्षलवादी कसनासूर गावात येऊन गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या दोघांची नावे सांगून या दोन्ही नक्षल्यांनी साईनाथचे नाव सांगून गावातून धान्य जमा केले. कसनासूर या गावात साईनाथ तथा इतर नक्षलवादी अनेकदा येत असत. याच गावातील राजू वेलदा व चिन्नी मडावी हे दोघे नक्षलवादी चळवळीत सक्रिय होते. यातील जहाल नक्षली राजू वेदलाने शरणागती पत्करली, तर चिन्नीला पोलिसांनी अटक केली.

एटापल्ली तालुक्यांतर्गत शरोली ग्रामपंचायतमध्ये येणारे गट्टेपल्ली हे गाव पेरीमिलीपासून घनदाट जंगलात १२ किलोमीटर आत आहे. ३०० लोकसंख्येच्या गावात शिक्षक येत नसल्याने तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेची शाळा बंद आहे. त्यामुळे या गावातील बहुसंख्य मुले बाहेर गावी शिकायला जातात. जहाल नक्षलवादी साईनाथचे हे जन्मगाव. त्यामुळे या गावात त्याचा वावर कायम असतो, असे ग्रामस्थांनी सांगितले. गावातील अनेकांशी तो संपर्कात होता. साईनाथमुळे पोलिसही गावात येत. मात्र, त्यांचा काहीही त्रास नव्हता. फक्त पोलीस साईनाथने शरण यावे यासाठी आग्रही होते. तसे त्यांचे संदेशही ग्रामस्थांकडे वारंवार येत होते, परंतु साईनाथ स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन करायला तयार नव्हता. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार साईनाथ आठही जणांच्या संपर्कात होता. २१ एप्रिल रोजी हे आठ तरुण लग्नाला जातो असे सांगून गावातून निघाले त्याच वेळी साईनाथ सोबतच त्यांची भेट झाली असावी आणि तोच त्यांना इंद्रावती नदीच्या पात्रात घेऊन गेला असावा, अशी शक्यता गट्टेपल्लीतील काही ग्रामस्थांनी बोलून दाखवली. तर काहींनी पोलिसांना हे आठ तरुण गटेपल्लीत मिळाले असावेत आणि तेथून पोलीस त्यांना घेऊन गेले असावेत असाही संशय व्यक्त केला. आठ जण बेपत्ता असल्याचे लक्षात येताच पेरीमिली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेतली.

मुलांना शोधण्याची धडपड सुरू असतानाच बुज्जी उसेंडी हिच्या मृतदेहाची ओळख पटली. त्यामुळे इतर सात जणांचाही यात समावेश असावा असा संशय आला. आता पोलिसांनी मृतदेहाचे व आमचे डीएनए नमुने घेतले आहे. दोन्ही नमुने मिळले तर ते सात जण चकमकीत ठार झाले यावर आमचा विश्वास बसेल, असे गावातील काही ग्रामस्थ बोलले.

साईनाथ सोबत या आठही जणांना आम्ही गावात किंवा इतरत्र कधीच बघितले नाही ही वस्तुस्थिती आहे, असेही त्यांनी सांगितले. मंगेश मडावी व बुज्जी उसेंडी या दोघांचे वय सोडले तर गावकऱ्यांनी सर्वाचे वय २१ वर्षांपेक्षा जास्त आहे, असे सांगितले. आता पोलीस चकमकीत ठार झालेल्या आठही जणांचे आधार कार्ड घेऊन गेले आहेत.

मंगेश मडावी हा ११व्या वर्गात भगवंतराव आत्राम आश्रमशाळेत शिकत होता.

सुट्टीमध्ये तो गावात आलेला होता. त्यामुळे तो नक्षलींच्या संपर्कात कसा आला आणि लग्नात सहभागी झालेल्या गोंगलू गावडे याने मुले लग्नस्थळी दिसली नाही ही माहिती गावात दिली. तेव्हाच ग्रामस्थांनी पोलीस तक्रार का केली नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहे.

पोलिसांनी या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करताना कसनासूर या गावातील सर्व गावकऱ्यांना ताडगाव पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानंतर २ मे रोजी लग्नघराचे वडील, मुलगा, मुलीचे आई-वडील व तीन गावकरी अशा सात जणांना चौकशीसाठी बोलावले होते. तर गटेपल्ली गावात काल बुधवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत पोलीस ठाण मांडून बसले होते. हे सर्व तरुण नव्यानेच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शवविच्छेदनाची ध्वनीचित्रफित

चकमकीत ठार झालेल्या सर्व ४० मृतदेहाचे शवविच्छेदनाची ध्वनीचित्रफित सादर करण्यात आली. डीएनए नमुने तसेच व्हीसेरा नमुनेही घेण्यात आले आहेत. पोलिसही अतिशय बारकाईने हे प्रकरण हाताळत आहेत. मुले लग्नाला आलेली नव्हती असे गोंगलू गावडे याचे म्हणणे नोंद करून घेतले आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले. कालपर्यंत १९ मृतदेहांची ओळख पटली होती. त्यातील १४ मृतदेह कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. उर्वरीत २१ मृतदेहांची अजूनही ओळख पटलेली नाही. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पोलीस आता परवानगी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.