कपडे धुण्यासाठी बंधार्‍यावर गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु़) शिवारात घडली. स्वप्नाली गणेश पाटील (वय २५) व वैष्णवी उमेश पाटील (वय २०) असे मृत महिलांची नावे असून दोघीही नात्याने सख्ख्या जावा होत्या.

पिंपळा (बु) येथील स्वप्नाली पाटील व वैष्णवी पाटील या सख्ख्या जावा बुधवारी सकाळी त्यांच्या शेतातील बंधार्‍यात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. बंधार्‍यात १७ फूट पाणी होते. कपडे धुवत असताना एका महिलेचा पाय घसरून पाण्यात पडली. तिला वाचविण्यासाठी दुसरीने पाण्यात उडी घेतली. मात्र, यात दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेजारील एका महिलेच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तिने ही माहिती ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थ येईपर्यंत दोघींचा बुडून मृत्यू झाला होता.

स्वप्नाली पाटील यांच्या मागे पती, सासू-सासरे, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. वैष्णवी उमेश पाटील यांचे एक वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या मागे पती, सासू-सासरे असा परिवार आहे़

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत मृताचे चुलत सासरे भिवा मुरलीधर पाटील (रा़. पिंपळा बु) यांनी दिलेल्या माहितीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक चौरे, धनाजी वाघमारे, महावरकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़. पार्थिवाचे शवविच्छेदन काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले़.