महाराष्ट्रातील बल्लारपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या प्रेम प्रकरणामुळे त्रस्त असलेल्या आयटीआयच्या एका ४० वर्षीय शिक्षकाने पोटच्या दोन मुलींची हत्या करुन त्यांचे फोटो व्हॉटसअॅपवरुन विभक्त झालेल्या पत्नीला पाठवले. या शिक्षकाने सुद्धा आत्महत्या करुन जीवन संपवले. ऋषीकांत असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

ऋषीकांतच्या पत्नीचे स्थानिक ड्रायव्हरसोबत प्रेम प्रकरण सुरु होते. त्यामुळे तो त्रस्त होता असे ऋषीकांतचा भाऊ गोपाळ.सी.कुदूपाल्लीने सांगितले. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली असे पोलीस अधिकारी सुनील कांबळे यांनी सांगितले.

ऋषीकांतची पत्नी काही दिवसांपूर्वी ड्रायव्हरसोबत पळून गेली होती असे गोपाळ.सी.कुदूपाल्लीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. एक मुलगी सहा वर्षांची तर दुसरी मुलगी दीडवर्षांची आहे. पत्नीचे प्रेम प्रकरण आणि ती घरातून पळून गेल्यामुळे ऋषीकांतने हे टोकाचे पाऊल उचलले असा दावा त्याचा भाऊ गोपाळ.सी.कुदूपाल्लीने केला आहे.