यंदाचा दुष्काळ डोळ्यासमोर ठेवून दुष्काळी भागातील जलसिंचन योजनांना एआयबीपीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून गती देण्यात यावी, अशी सूचना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सातारा येथे केली.
सातारा जिल्ह्य़ातील दुष्काळी व टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहात बैठक झाली. या वेळी अर्थ व जलसंपदा मंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार उपस्थित होते. दुष्काळ निवारणासाठी साह्य़भूत ठरणाऱ्या योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील तलावातील गाळ काढणे, दुरुस्ती, नालेजोड उपक्रम हाती घ्यावेत, असे सांगून ते पुधे म्हणाले की पवार यांनी जिल्हा नियोजनातून पंचवीस टक्के निधी राखून ठेवावा, वैरण विकास योजना, दुष्काळी भागाला पिण्याचे पाणी पुरविण्याला प्राधान्य रहावे, दुष्काळावर मात करण्यासाठी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करावे.