उद्धव यांचे संकेत
अन्नसुरक्षा योजनेखाली सडलेले धान्य मिळत असेल तर ते घेऊन विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात जा आणि आवाज उठवा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी जालना येथे पक्षाच्या आमदारांना देऊन एकप्रकारे अधिवेशनातील शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेचेच संकेत दिले.
जालना जिल्ह्य़ातील एक हजार गरजू शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सडलेले धान्य देण्याचे प्रकार काँग्रेसच्या राजवटीत चालले असतील. परंतु शिवसेना सत्तेत असताना ते चालणार नाही असा इशारा त्यांनी दिला. जनहिताच्या योजनांची अंमलबजावणी शिवसेना सत्तेत असूनही होत नसेल तर त्यासाठी आपण जबाबदारी घेतली पाहिजे. अधिकाऱ्यांना सरकारी भाषा कळत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत बोलायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्कच माफ करून चालणार नाही तर त्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ केले पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात सहकार सम्राट व शिक्षण सम्राटांनी अनेक शासकीय जागा बळकावून स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने विद्यापीठे काढली आहेत. दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी उचलली पाहिजे. जनतेचा आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली जात आहे. कोणतीही निवडणूक आहे म्हणून नव्हे तर शेतकरी अडचणीत आला आहे म्हणून शिवसेना त्यांना धीर देण्यासाठी पुढे आलेली आहे असे उद्धव यांनी सांगितले.