राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. महायुती व महाआघाडीतील पक्ष विविध मुद्यांवरून एकमेकांवर जोरादार आरोप प्रत्यारोप करत आहे. यातलीच एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याचा मुद्दा आहे. सरकारकडून गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे धोरण आखल्या गेल्यानंतर, यावर विरोधीपक्षांसह सर्वचस्तरातून टीका झाल्याचे प्रामुख्याने पाहायला मिळाले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज व नुकताच भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांनी याबद्दल घेतलेली भूमिका व व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

उदयनराजे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत, गडकिल्ले लग्नसमारंभासाठी भाडे तत्त्वावर देण्यात चुकीचे काय? असे म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी हे देखील सांगितले की, लग्नसमारंभांसाठी गडकिल्ले भाडे तत्त्वावर देण्यात काही चुकीचे वाटत नाही. सरकारच्या याबाबतच्या धोरणाला माध्यमांकडून चुकीचे वळण देण्यात आले आहे. मी स्वतः पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली असून, मला त्यांनी सरकारचे याबाबतचे धोरण पूर्णपणे समजावून सांगितले आहे. सरकारच्या धोरणात गडकिल्ल्यांचा काही भाग लग्नसमारंभांसाठी भाडे तत्त्वावर देण्याबाबत म्हटले गेले आहे. त्यामुळे यामध्ये मला तरी काही चुकीचे वाटत नाही. आपण देवळात लग्न लावत नाहीत का? असा प्रश्न करत गडकिल्ले भाडे तत्त्वावर दिल्यास आपल्याच देशाची अर्थव्यवस्था सुधारेन असेही ते म्हणाले.

पर्यटनास चालना देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यभरातील २५ गडकिल्ल्यांची भाडे तत्वावर देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे ५० ते ६० वर्षे हे गडकिल्ले भाडे तत्वावर देण्यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील असल्याचे समजल्यावर विरोधकांकडून याला जोरदार विरोध केला जात आहे.