महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. अशात आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्राला मिळू शकते. मात्र त्यांच्यातल्या वाटाघाटी अजूनही सुरु आहेत. १७ नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी सरकार स्थापन होणे अवघड आहे हे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. एवढंच नाही तर अजून बराच वेळ लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र शिवसेना सातत्याने मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे सांगते आहे. या सगळ्या परिस्थितीवर वेट अँड वॉचची भूमिका घेतलेल्या भाजपाने आता सरकार भाजपाचेच येणार असा दावा केला आहे. त्यावर शिवसेनेने कडाडून टीका केली आहे.

सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राष्ट्रपती राजवट लागू होताच आता सरकार फक्त आमचेच बरे का! हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? राष्ट्रपती राजवटीच्या आड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. पुन्हा आमचेच सरकार अशा किंकाळ्यांमुळे महाराष्ट्राच्या कानाचे पडदे फाटत आहेत. अशाने जनतेचे कान बधिर होतील, पण किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल का? याची आम्हाला चिंता वाटत असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर कडाडून टीका करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
राज्यात नवी समीकरणे जुळून येत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत. कोण कसे सरकार बनवतो तेच पाहतो अशा प्रकारची अप्रत्यक्ष भाषा व कृती सुरू झाली आहे. सरकार बनवलेच तर ते कसे आणि किती दिवस टिकते ते पाहू असे शाप दिले जात आहेत. सहा महिन्यांच्या वर सरकार टिकणार नाही असे ‘भविष्य’ सांगितले जात आहे. हा नवा धंदा लाभदायक असला तरी अंधश्रद्धा कायद्यात मोडतो. स्वतःचे षंढत्व लपवण्यासाठी सुरू झालेले हे उद्योग महाराष्ट्राच्या मुळावर येणारे आहेत. महाराष्ट्राचे आपण मालक आहोत व देशाचे आपण बाप आहोत असे कुणाला वाटत असेल तर त्यांनी या खुळ्या मानसिकतेतून सर्वप्रथम बाहेर पडले पाहिजे. ही मानसिक अवस्था 105 वाल्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. ही स्थिती जास्त काळ राहिली तर मानसिक संतुलन बिघडून वेडेपणाच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू होईल.

आता जे पुन्हा भाजपचेच सरकार येईल असे सांगत आहेत त्या 105 वाल्यांनी आधीच राज्यपालांना भेटून स्पष्ट केले आहे की, आमच्याकडे बहुमत नाही! त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असे सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आता सरकार फक्त आमचेच बरे का!’ हे कोणत्या तोंडाने सांगत आहेत? जे बहुमत त्यांच्यापाशी आधी नव्हते ते राष्ट्रपती राजवटीच्या वरवंटय़ाखालून कसे बाहेर पडणार, हा प्रश्न असला तरी आम्ही लोकशाही व नैतिकतेचा खून करून ‘आकडा’ लावू शकतो ही भाषा महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही. मग बोलणाऱया तोंडाची डबडी कोणत्याही पक्षाची असोत. राष्ट्रपती राजवटीच्या पडद्याआड घोडेबाजार भरवण्याचे हे मनसुबे आता उघड झाले आहेत. स्वच्छ, पारदर्शी कारभार करण्याचे वचन देणाऱयांचा हा खोटारडेपणा आहे व तो पुनःपुन्हा उघड होत आहे.