आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचे ‘आवतन’ असल्याची टीका

विशेष प्रतिनिधी, नाशिक

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपण  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालून कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सटाणा येथील पाठक मैदानावर बुधवारी सायंकाळी बागलाण विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार दिलीप बोरसे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत भाजपने केलेल्या विकास कामांची माहिती देत काँग्रेस-राष्ट्रवादीचा समाचार घेतला. आघाडीचा जाहीरनामा म्हणजे लबाडाघरचे आवतन आहे. प्रत्येक नागरिकाला एक ताजमहाल बांधून देऊ ही एकच गोष्ट राहून गेल्याचे सांगत  आघाडीच्या जाहीरनाम्याची त्यांनी खिल्ली उडविली. विरोधकांनी १५ वर्ष खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकल्या. एकही आश्वासन पूर्ण केले नाही. केवळ स्वत:ची घरे भरण्याचे काम केले. भाजपचे काम जनतेने अनुभवले असल्याने त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची वाईट अवस्था केली. शरद पवार यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. राज्यात निवडणुका असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात सहलीला जातात. हे देशहित आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

उत्तर महाराष्ट्राला वरदान ठरणाऱ्या नार-पार प्रकल्पावर आघाडीने इतकी वर्ष केवळ राजकारण केले. भाजपने ृपाच वर्षांत पाठपुरावा करून कामाला मान्यता देऊन सर्वेक्षण सुरू केले. भाजपला साथ दिल्यास हा प्रकल्पही पूर्णत्वास नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.