आर.आर.पाटील यांनी राज्यात गुटखाबंदी, डान्सबारबंदी केली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदी यांचं सरकार उद्योगधंदे बंद करून युवकांना बेरोजगार करत आहे. यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना संधी मिळणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाल घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी आधी चांगल काम करून दाखवावं, त्यानंतरच उपमुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पहावं, असा टोला आर.आर.पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी लगावला.

आघाडीच्या सरकारने अनेक चांगल्या योजना राबविल्या. त्याच योजनांची नावं बदलण्यात हे सरकार धन्यता मानत आहे. सध्या माय-भगिनींवर बलात्काराचं प्रमाणही वाढलं आहे. सरकार केवळ सत्तेचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचं काम करत आहे. परंतु जनतेला सर्व कळत आहे. त्यामुळे यंदा सत्तांतर अटळ असल्याचं स्मिता पाटील म्हणाल्या. एका दैनिकाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. यावेळी सहानुभूतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर आपल्या आई विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेल्यावेळी आर.आर.पाटील यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. त्यामुळे आईला विजय मिळाला. परंतु २०१५ नंतर आतापर्यंत त्यांनी आपल्या मतदारसंघात तब्बल शंभर कोटी रूपयांची कामं केली आहेत. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे सत्ता नसताना त्यांनी मोठ्या प्रणामात निधी आपल्याकडे खेचून आणल्यानं मतदार राजा समाधानी असल्याचे पाटील म्हणाल्या.