औरंगाबाद : काही प्रश्न आले, समस्या निर्माण झाल्या. आजही कचऱ्याचा प्रश्न पूर्णत: संपलेला नाही. राग मान्य आहे. चूक सुधारण्याची जबाबदारीही मान्य आहे. पण शिक्षा देताना स्वत:लाही शिक्षा होईल आणि पुढच्या पिढीलाही शिक्षा होईल, असे करू नका. या शब्दात जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जाहल्या काही चुका असा सूर आळवावा लागला.

लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर  ते बोलत होते. चूक झाल्यानंतर कान पकडायचा अधिकार तुम्हाला आहेच. सुधारण्याची जबाबदारी माझी. पण या निवडणुकीत बाटलीतला राक्षस बाहेर काढू नका, असे आवाहन करत  उद्धव यांनी कचरा  व पाणी समस्येवर भाष्य केले.

औरंगाबाद येथे मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात उद्धव ठाकरे यांनी  ‘संभाजीनगर की औरंगाबाद’ प्रश्न उपस्थित करत ‘रझाकार, हिरवा साप’अशी प्रतीके वापरून त्यांनी एमआयएमवर टीका केली. सरकारमध्ये असताना कधीही पायात पाय घालण्याचा प्रयत्न केला नाही, असेही ते म्हणाले. ही बाब भाजपच्या नेत्यांनी आवर्जून सांगावी असेही ते म्हणाले.

समान नागरी कायदा  ही शिवसेनेची मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. भाषणात हा विषय सुरू असतानाच राम मंदिर असा आवाज आला. ते तर हवेच असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण त्यांनी यावर फारसे भाष्य केले नाही. सातबारा कोरा करणार, दहा रुपयात भोजन  देणार अशी आश्वासनेही त्यांनी दिली.

औरंगाबादमधील तीनही मतदारसंघात सेनेची एमआयएमशी लढत होणार असल्याने ठाकरे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीबरोबरच एमआयएमलाही लक्ष्य केले.