पुण्याच्या कबीर कला मंचचे सक्रिय सदस्य तसेच नक्षलवादी चळवळीत कार्यरत चार तरुणांनी आज मुंबईत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. हे तरुण चळवळीत सक्रिय असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. विद्रोही कविता आणि शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्थेला विरोध करणाऱ्या पुण्यातील कबीर कला मंचचे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने या चळवळीत सक्रिय असलेल्या अँजेला सोनटक्के व तिच्या काही साथीदारांना पुण्यातून अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी शाहीर व विद्रोही कवी शीतल साठे व सचिन माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात या दोघांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कबीर कला मंच व या चळवळीच्या संबंधांवर आणखी प्रकाशझोत पडला होता.
केवळ साठे व माळी हे दोघेच नाही, तर पुण्यातील आणखी काही तरुण नक्षलवादी चळवळीत सक्रिय आहेत व उत्तर गडचिरोलीच्या जंगलात सशस्त्र नक्षलवाद्यांसोबत तळ ठोकून असल्याची माहिती गेल्या मार्च महिन्यात गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या काही नक्षलवाद्यांनी दिली होती. त्याचा आधार घेत लोकसत्ताने काही दिवसापूर्वी या सर्व प्रकरणावर वृत्त मालिका प्रकाशित केली होती. त्यावरून मोठे वादळ उठले होते. या पाश्र्वभूमीवर आज पुण्यातील चार तरुणांनी आर.आर.पाटील यांच्यापुढे मुंबईत आत्मसमर्पण केले. यात प्रशांत कांबळे, रमेश गायचोर, रुपाली जाधव व सागर गोरखे यांचा समावेश आहे. हे चौघेही नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेसोबत जंगलात सक्रिय होते असा पोलिसांचा दावा आहे.
प्रशांत कांबळे चळवळीत ‘मधू’ या नावाने, रमेश गायचोर ‘आकाश’ या नावाने, रुपाली जाधव ‘प्रियंका’ या नावाने तर सागर गोरखे हा ‘योगेश’ या नावाने ओळखले जातात, असा दावा पोलिसांनी केला आहे. साठे व माळी यांच्यापाठोपाठ हे चारही तरुण पोलिसांना शरण आल्याने शहरी भागात चळवळीचा विस्तार करण्याच्या नक्षलवाद्यांच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. या सहाही जणांना लवकरच चौकशीसाठी गडचिरोलीत आणले जाणार असल्याची माहिती पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी आज सायंकाळी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2013 रोजी प्रकाशित
चार नक्षलवादी तरुणांचे मुंबईत आत्मसमर्पण
पुण्याच्या कबीर कला मंचचे सक्रिय सदस्य तसेच नक्षलवादी चळवळीत कार्यरत चार तरुणांनी आज मुंबईत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. हे तरुण चळवळीत सक्रिय असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रकाशित केले होते. विद्रोही कविता आणि शाहिरीच्या माध्यमातून व्यवस्थेला विरोध करणाऱ्या पुण्यातील कबीर कला मंचचे नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून पोलिसांकडून केला जात आहे.

First published on: 08-05-2013 at 04:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 4 youth naxals surrender in mumbai