इंदू मिलच्या जागेवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येईल व त्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली.
इंदू मिलच्या जागेवरील स्मारकाचा प्रस्ताव सुभाष चव्हाण यांनी मांडला होता. तीन दिवसातील या विषयावरील चर्चेचा धांडोळा घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी सनदशीर मार्गाने गेलो तर यश मिळते, या शब्दात जागा प्राप्तीचे यश अधोरेखित केले. सात वर्षांपूर्वी यासंबंधी सुकाणू समितीची स्थापना, त्यासंबंधीच्या बैठका, गेल्यावर्षी हिवाळी अधिवेशनात २० डिसेंबरला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला ठराव या सर्व घडामोडींची पाश्र्वभूमी आणि जनादेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी इतर लोकप्रतिनिधींसह पंतप्रधान कार्यालयाला भेट दिली होती. इंदू मिलची जागा कोस्टल रेग्युलेशन झोनमध्ये (सीआरझेड) येत असल्याने आरक्षण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यासाठी सीआरझेडला जागेचा व्यावसायिक वापर होणार नाही, यासंबंधी आश्वासन द्यावे लागले. राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाने (एनटीसी) इंदू मिलच्या जागेच्या जवळच असलेल्या हिंदूुस्थान मिलची जागा हॉटेल बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाला एफएसआय वाढवून दिला. त्याचीही शहानिशा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली. हिंदुस्थान मिलच्या जागेवर हॉटेल उभारण्यास परवानगी नाकारण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. केंद्र शासनाकडे जागा मागताना अनेक पर्याय खुले ठेवण्यात आले होते. त्यात जमीन तुमच्याकडेच ठेवा केवळ आम्हाला वापरायला द्या, टीडीआर पाहिजे असेल तर टीडीआर घ्या पण, स्मारकासाठी जागा द्या, असेही सुचवण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठी कामगिरी म्हणजे त्यांनी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले. त्या कायद्यामुळेच कोणताही प्रश्न घटनात्मक मार्गानी सुटू शकतो. केवळ आंदोलनाने नव्हे. सर्वाच्याच संयुक्त प्रयत्नांमुळे ही जागा मिळाली. मुख्यमंत्री म्हणून इंदू मिलच्या जागेची घोषणा ६ डिसेंबरच्या आधी करावी, एवढी विनंती केंद्राला केली होती, असे चव्हाण म्हणाले.
स्मारकाची संकल्पना प्रथम स्पष्ट करावी लागेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तज्ज्ञाकडून स्मारकाचे डिझाईन करणार आणि नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशा तीन टप्प्यात स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यासाठी निधी कमी पडेल अशी शंका चुकूनही मनात आणू नका, असेही विरोधकांना स्पष्ट सांगितले.