राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी एक ट्विट करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. यावर आता अमृता फडणवीस यांनी माध्यामांशी बोलाताना संतप्त प्रतिक्रिया दिली.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी परत एकदा सागंते माझ्यावर तुम्ही जे आरोप करत आहात आणि माझ्या माध्यामातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर, आम्ही स्वतंत्र व्यक्ती आहोत, आमची वेगळी ओळख आहे. मी सामाजिक कार्यकर्ती, बँकर आणि गायिका आहे. मी माझी ही ओळख जपली आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. कारण, मी खऱ्याची साथ सोडत नाही आणि खोट्याची साथ देणाऱ्याला देखील नाही सोडत. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातय, आमच्याकडे असं काहीच नाही जे ते उघड करू शकतात. आमच्याकडे भूखंड, साखर कारखाने असं काहीच नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही.”

तसेच, “मला वाटतं की ते त्यांनी त्यांच्या जावायला विचारावं की कोण कोणाच्या पाठीशी आहे. मी एवढच सांगेन बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा. ही केवळ वेळेची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्याला काही सूचत नाही, एखाद्यामध्ये नकारात्मकता आलेली असते, खराब विचार असतात तेव्हा तो सगळं खराबच पाहतो किंवा खराब करायचा प्रयत्न करतो. तुम्ही मर्द आहात ना तर थेट त्यांच्यावर निशाणा साधा, मला मध्ये आणू नका. मी माझे केवळ विचार मांडते आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ते करत राहील. कुणीही ते थांबवू शकत नाही.” असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

फडणवीस, मुनगंटीवार यांनी अभिनय केलेल्या, अमृता यांनी गायलेल्या ‘रिव्हर साँग’चं ड्रग्ज प्रकरणाशी काय कनेक्शन?

याचबरोबर, “आज आपल्याला काय दिसून येत आहे. आज जी माणसं प्रेमापोटी काम करत आहेत, त्यांनाच लाथ मारली जात आहे. जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, रिव्हर मार्च वाले आहेत त्यांना एकही राजकीय अभिलाषा नाही, त्यांच्या मागे धावलं जातंय. हे कोणतं राजकारण आहे? तुम्हाला बिघडे नवाब व्हायचं आहे? तुम्ही बिघडे नवाबची जी उर्जा आहे ती सुधरे नवाबमध्ये बदलली पाहिजे. तरच आपला महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. नाहीतर आपलं खरं नाही. माध्यमांना हे सगळे प्रश्न या बिघड्या नवाबला किंवा त्यांच्या बॉसला, त्यांच्या सुपर बॉसला विचारावे लागेतील.” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्ज उद्योगाचे मास्टर माइंड असल्याचा धक्कादायक आरोपही नवाब मलिक यांनी केलाय. मात्र पत्रकार परिषदेआधी मलिक यांनी ट्विटवरुन अमृता फडणवीस यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता. याच फोटोबद्दल खुलासा करताना फोटोमधील व्यक्ती जयदीप राणा असून अमृता फडणवीस यांनी गायलेल्या मुंबईमधील नद्यांच्या संवर्धनासंदर्भातील गाण्याचा तो फायनान्स हेड होता असा दावा मलिक यांनी केलाय. तसेच या गाण्याचा कथित ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी काय संबंध आहे याबद्दलही नवाब मलिक यांनी माहिती दलीय.

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर देखील दिले. यामध्ये त्यांनी केवळ दोन ओळीचं ट्वीट करत मलिकांना लक्ष्य केले. चोराच्या उल्ट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरीत बुद्धी असते! असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे.