कोकण हार्टेड गर्ल या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर ही इन्फ्लूएन्सर अलीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे. आज (९ एप्रिल) शिवतीर्थावर (छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर) मनसेचा गुढीपाडवा मेळावा होत असून अंकिता या कार्यक्रमासाठी दुपारीच शिवाजी पार्कवर दाखल झाली आहे. यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही तिची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. अंकिताने राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीत झालेल्या भेटीबाबत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात घडणाऱ्या घडामोडींवरही भाष्य केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. अद्याप राज ठाकरे, मनसे किंवा भाजपाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. अलीकडे राज ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रश्न विचारले तेव्हा-तेव्हा त्यांनी पाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरून या प्रश्नांना उत्तर देईन असं सागितलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आज शिवतीर्थावरून कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी अंकिता वालावलकरही शिवतीर्थावर दाखल झाली आहे. तसेच तिने काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी या विषयावर बातचीत केली.

अंकिता वालावलकर म्हणाली, राज ठाकरे यांचं आजचं भाषण ऐकण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी नवीन वर्षाचं स्वागत करायचं, गुढी उभारायची आणि संध्याकाळी राज ठाकरेंचं भाषण ऐकायचं हा आमचा नित्याचाच क्रम आहे. यावेळी राज ठाकेर काय बोलणार याकडे माझंही लक्ष लागलं आहे. ज्या काही बातम्या सध्या आपण ऐकतोय, वाचतोय, पाहतोय त्यावरून लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची आज आपल्याला उत्तरं मिळतील.

मला एक फोन आला आणि या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं. ज्या व्यक्तीला मी लहानपणापासून पाहतेय त्यांच्या कार्यक्रमाचं मला निमंत्रण मिळाल्यामुळे मी त्वरीत निघाले. मला राज ठाकरे यांचा स्पष्टवक्तेपणा आवडतो, त्यांचा स्वभाव आवडतो. आज मी त्यांना प्रत्यक्ष भाषण करताना पाहणार आहे. मनसेच्या निमंत्रणावरून मी इथे आलेय याचाही मला खूप आनंद आहे.

हे ही वाचा >> “चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…

दरम्यान, सध्या राज ठाकरेंबाबत राजकीय वर्तुळात ज्या चर्चा ऐकायला मिळतायत त्यावरून अंकितला प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, राज ठाकरे यांनी सरकारमध्ये सामील होण्यापेक्षा त्यांनी सरकार बनवावं, मुख्यमंत्री व्हावं, अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला कधीकधी वाटतं सर्वांनी मिळून ठरवायला हवं आणि राज ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला हवं. राज ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर किमान काही महिने त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहावं अशी माझी इच्छा आहे. ते आपलं राज्य कसं सांभाळतात हे लोकांना पाहायला मिळावं.