आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर ग्रुपची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा झाली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. तसंच, आगामी लोकसभा निवडणूक इंडियाअंतर्गतच लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, ३ सप्टेंबरपासून महाराष्ट्र पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. तसंच, ४८ लोकसभा मतदारसंघात आम्ही सर्वे केला होता. या सर्वेचं परीक्षण या बैठकीत करण्यात आलं. लोकसभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील पक्षांतर्गत वादाविषयीही विचारण्यात आले. तसंच अजित पवार आणि शरद पवारांनी भेट घेतल्याने निर्माण झालेल्या संभ्रमाविषयीही विचारण्यात आले. त्यावेळी नाना पटोलेंनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. "राष्ट्रवादी पक्षातील तो अंतर्गत वाद आहे. पवार त्याबाबत निर्णय घेणार आहेत. परंतु, शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे की ते इंडिया आघाडीसोबत राहणार आहेत. पक्षातील समस्यांबाबत चर्चा करून ते निर्णय घेतील. महाराष्ट्र काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेसची व्होट बँक महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील व्होट बँकेच्या आधारे घटकपक्षाला ताकद दिली जाईल. भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करणं हाच आमचा प्लान बी आहे. काँग्रेसच्या मनात शरद पवारांबाबत काहीही संभ्रम नाही", असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.