संमेलनाच्या मांडवातून
शफी पठाण
राजकीय भोंग्यांनी राज्य व देशभरातील वातावरण ढवळून निघत असताना इकडे संमेलनाचीये नगरी असलेल्या उदगीरमध्येही दोन भोंगे वाजताहेत. अगदी जोरात. एक प्रस्थापितांचा, दुसरा विद्रोहींचा. स्पर्धा वैगेरे काही थेट नाही. पण, आपल्याच भोंग्याचे ‘डेसिबल’ जास्त असावे, यासाठीचे प्रयत्न मात्र दोन्हीकडे सारखेच सुरू आहेत. दोन्ही संमेलनांत ‘साहित्य’ हा समान घटक असला तरी त्याची ‘जातकुळी’ मात्र प्रचंड वेगळी आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता प्रस्थापितांचे संमेलन अजूनही ‘श्रेयस-प्रेयसा’च्या मोहक वलयातून बाहेर पडायला तयार नाही. येथे अजूनही पारंपरिक परिसंवादांचा पाऊस पडतोय, तर तिकडे वेदनेतून जन्मलेल्या विद्रोही कवितांची जणू ‘सुनामी’ आलीेये. नाही म्हणायला काही चार – दोन डावे प्रस्थापितांच्या मांडवातील प्रत्येक सत्रात दिसताहेत खरे. पण, त्यांचे डावेपण उजव्यांच्या आश्रयाने ‘उपकृत’ झाल्याचे श्रोतेच सांगाताहेत खासगीत. विद्रोहींच्या मांडवात मात्र आडपडदा नाही. ‘शब्दांचीच शस्त्रे यत्न करू..’ असे सांगत ते थेट ललकारताहेत व्यवस्थेला. याबाबतीत दोन्हीेकडे जाऊन येणाऱ्या एक तटस्थ श्रोत्याची प्रतिक्रिया फारच बोलकी होती. काय वैचारिक अंतर जाणवतेय या दोन्ही संमेलनात..? असे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘तिकडेच्या मंचाला लता मंगेशकरांचे नाव आहे आणि इकडच्या मंचाला बसवण्णांचे..झाले माझे उत्तर संपले’’ त्या श्रोत्याने दिलेल्या याच उत्तरातील अंतर या दोन्ही संमेलनांच्या भोजनावळीतही जाणवतेय. प्रस्थापितांच्या मांडवात पुरणपोळी-आमरसाच्या पंगती झडताहेत. इकडे विद्रोहीवाले एक रुपया आणि मूठभर धान्य मागत हलगी वाजवून गावभर हिंडताहेत.दोन्हींचे रस्ते वेगळे आहेत, उद्देशही वेगळे असतील कदाचित. उत्साह मात्र सारखा आहे. उदगीरवासी दोन्हीकडे जाऊन या उत्साहाचे साक्षीदार होताहेत. आपापल्या आवडीनुसार जिथून जे संचित मिळेल ते पदरी साठवताहेत व पदरमोड करून विकत घेतलेल्या पुस्तकांचे गाठोडे बांधून उंबऱ्याकडे परतताहेत. उद्या जेव्हा केव्हा हे गाठोडे उघडले जातील तेव्हा त्यातील उन्नत विचारांनी आधी घरे व नंतर वस्त्या प्रकाशमान होतील. त्या तशा प्रकाशमान व्हाव्या हाच तर या दोन्ही संमेलनांचा अंत:स्थ हेतू आहे. दोघांचाही मार्ग वेगळा असला तरीही..!