रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपा राज्य सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली असल्याचं या कारवाईबद्दल मत व्यक्त केलं आहे. तसेच, भाजपा कार्यकर्त्यांना, आंदोलन, उपोषण, मोर्चा, सरकारी कामकाजात असहयोग, सोशल मीडियावर आवाज उठवून याबद्दल राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ”भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकवता येणार नाही. म्हणून एका वास्तुविशारद आत्महत्या प्रकरणी जी केस २०१८ सालीच बंद झाली होती, ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो.”

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

आणखी वाचा- “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण…,” अर्णब गोस्वामी अटकेवरुन फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

तसेच, ”मी महाराष्ट्रातील जनतेला आणि आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की आपण आपल्या पद्धतीने राज्य सरकारचा आंदोलन करून विरोध करा – उपोषण करा, सरकारी कामकाजात असहयोग दाखवा, सोशल मीडियावर आवाज उठवा, मोर्चा काढा. काँग्रेस सोबत राहून या सरकारला वाटत आहे की, हे महाराष्ट्रात हुकूमशाही पद्धत लागू करू शकतात.. महाराष्ट्र हे कधीच होऊ देणार नाही.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

”आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधीजींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी मी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवणार !” असंही चंद्रकांत पाटील ट्विटद्वारे म्हणाले आहेत.