राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून १ मे पर्यंत लॉकडाउन लावण्यात आला आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा झाल्याने राज्य सरकार केंद्राकडे तात्काळ मदत मागत असून यावरुन आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु आहे. आऱोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तर राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्यातील आरोग्य सुविधांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांमध्ये चांगलीच जुंपली. ते न्यूज १८ लोकमतवर बोलत होते. केंद्रावर खापर फोडणं अयोग्य, तुम्ही काय करताय ते सांगा – प्रवीण दरेकर केंद्र सरकार मदत करतंय, मात्र ती पुरेशी नाही अशी टीका आव्हाडांनी केली. यावेळी प्रवीण दरेकरांची दिल्लीचं सांगता तेव्हा नागपूर खंडपीठाचं पण ऐका असा टोला लगावला. तसंच केंद्र आणि राज्य असं करु नका आवाहन करत तुमच्यासारख्या संवेदनशील नेत्यावरुन तरी आम्हाला अशी अपेक्षा नाही म्हटलं. केंद्राने आपली जबाबदारी पार पाडावी असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितल्यानंतर मग काय राज्याने बेजबाबदारपण वागावं का असा सवाल दरेकरांनी विचारला. “तुटवडा असतानाही बांग्लादेशला ऑक्सिजन द्यायची काय गरज होती?” जितेंद्र आव्हाडांचा सवाल! जितेंद्र आव्हाड यांनी ताटात असेल तेवढंच राज्य सरकार देणार असं सांगितल्यानंतर केंद्राच्या ताटाचाही विचार करा ना. त्यांनाही ताटानुसारच नियोजन करावं लागतं असं दरेकर म्हणाले. “राज्यातल्या मुद्द्यांवर केंद्राशी बोललो, तर पंतप्रधान बंगालच्या निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचं सांगण्यात आलं. पीपीई किट, व्हेंटिलेटर देखील केंद्राने महाराष्ट्राला कमी दिले. ऑक्सिजनचा देखील कमी पुरवठा केला जात आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ऑक्सिजनच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला सुनावलं आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. Oxygen Shortage: “राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायला तयार आहे!” दरेकरांची राज्य सरकारवर टीका "राज्य सरकारचा केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिाय एकही दिवस जात नाही. राज्य सरकारने करोना काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काय केलं याचा आकडा सर्वांसमोर आला पाहिजे. केंद्रानं दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन देण्याचं घोषित केलं असताना तो आणण्याची जबाबदारी कोणाची? त्यासाठी साधे ३२ टँकर उपलब्ध करु शकत नाही. वाहतुकीसाठी विशेष विमानांची व्यवस्था का केली जात नाही?," अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. १८ वर्षाच्या पुढील सर्वांच्या लसीकरणाला मोदींनी मान्यता दिल्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु आहे. जास्त बोलण्यापेक्षा कृती जास्त करा असं आवाहनच यावेळी प्रवीण दरेकर यांनी केलं. राज्य सरकारमध्ये एकवाक्यता नाही. "राजेश टोपे ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता आहेत सांगताना नवाब मलिक आणि आव्हाड ५० तर संजय राऊत ८० हजार इंजेक्शनची गरज असल्याच सांगत आहेत," असं प्रवीण दरेकर म्हणाले. आम्ही देत होतो तर ब्रुक फार्माच्या मालकाला आत टाकलं अशी टीका करताना तो साठा कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली. आपलं अपयश लपवण्यासाठी केंद्राला टार्गेट करण्याचा नियोजनबद्द कार्यक्रम सुरु असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. "केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकतं माप दिलं आहे. पण सातत्याने केंद्रावर टीका करताना आपलं नियोजन काय ते राज्य सरकारने सांगावं. आपल्याला जमत नाही पण केंद्राकडे ढकलणं चूक आहे," अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.