बुलढाणा जिल्हा केंद्रीय बॅंकेच्या थकित कर्जदार व जमानतदारांची मालमत्ता लिलावाद्वारे विकण्यात येत आहे. सर्व सभासदांनी वसुलीस योग्य प्रतिसाद देऊन बॅंकेचा परवाना मिळवून घेण्यात व बॅंक कामकाज सुरळीत करण्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी व जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी केले आहे.
याबाबत जारी करण्यात आलेल्या एका प्रसिध्दी पत्रात त्यांनी म्हटले आहे की, जिल्ह्य़ातील काही सामाजिक, राजकीय, गैरराजकीय संघटना व व्यक्ती जिल्हा सहकारी बॅंकेविषयी दिशाभूल करणारी चुकीची माहिती देऊन बॅंकेची नियमित वसुली भरणाऱ्या थकबाकीदारांमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत बॅंक व्यवस्थापनामार्फत जाहीर खुलासा करण्यात येत आहे की, सर्व शेती, तसेच बिगरशेती थकबाकीदारांविरुध्द बॅंकेने सर्व प्रकारची कायद्यानुसार कारवाई सुरू केलेली आहे.
बॅंकेची शेती कर्जाची मागणी २६२.६७ कोटी रुपये, तसेच बिगरशेती कर्जाची मागणी  १७५.३२ कोटी रुपये असून बॅंकेने वैयक्तिक बिगरशेती थकित कर्जाचे वसुलीसाठी कर्जदार,  तसेच जमानतदारांचे एकूण ७८ मालमत्तांचे जाहीर लिलावाची प्रक्रिया करून काही प्रमाणात कर्ज वसुली केलेली आहे. बॅंकेने दोन मोठय़ा युनिटस्कडील थकित कर्ज वसुलीसाठी या युनिटसची मालमत्ता विक्री करण्याकरिता जाहीर लिलावाची निविदा सूचना वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द केलेली आहे, तसेच एका मोठय़ा युनिटकडील कर्ज वसुलीकरिता त्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी जाहीर लिलावाची निविदा सूचना प्रसिध्द करण्याबाबतची कार्यवाही सुरू केलेली आहे. ज्या युनिटसकडून संपूर्ण मालमत्ता विक्री करूनही कर्जबाकी येणे राहणार आहे, अशा युनिटस्च्या वैयक्तिक संचालकांकडून उर्वरीत बाकी रक्कम वसूल करण्याबाबतची बॅंकेने कार्यवाही सुरू केलेली आहे. तसेच बॅंकेच्या थकित टॉप २० बिगरशेती कर्ज प्रकरणाचे ऑडिट सहकार विभागाकडून सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे बॅंकेच्या सर्व शेती व बिगरशेती थकबाकीदार सभासदांनी दिशाभूल करणाऱ्या कपोलकल्पीत माहितीस बळी न पडता आपल्याकडील थकबाकी रकमेचा भरणा वेळेत करावा व मालमत्ता जप्तीसारखी कोणतीही अप्रिय घटना टाळावी. तसेच बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सभासद या नात्याने हातभार लावावा.
सर्व सभासदारांकडून कर्ज वसुलीस योग्य प्रतिसाद वेळेत मिळाल्यास बॅंकेला बॅिंकंग परवाना मिळून बॅंकेचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होईल. थकित पीक कर्जाचा भरणा न केल्यास या कर्जावर व्याजाची आकारणी सुरू राहून त्यामुळे जास्तीच्या व्याजाचा भरुदड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे, तो टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थकित पीक कर्जाचा भरणा तत्काळ केल्यास त्यांना येत्या खरीप हंगामात नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊ शकते.