बुलढाणा जिल्हा भीषण दुष्काळ व तीव्र पाणीटंचाईच्या विळख्यात सापडलेला असताना त्यावर प्रभावी प्रशासकीय उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉ.बी.जी.वाघ यांची तडकाफडकी बदली केली आहे. वाघ यांच्या सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने राहिलेले असताना आता त्यांना अमरावती महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त या अकार्यकारी पदावर काम करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण १२ फे ब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्य़ातील दुष्काळ व पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी हवाई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अकार्यक्षम व नियोजनशून्य कारभारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. जिल्हा प्रशासन दुष्काळी उपाययोजनांच्या बाबतीत प्रत्यक्ष कृती कार्यक्रम न राबविता कागदोपत्री पोपटपंची करीत असल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आली होती. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या एकूणच कारभाराबद्दल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व विभागीय आयुक्त डी.आर.बनसोड यांना बुलढाण्याला पाठवून त्यांच्याकडून गोपनीय अहवाल मागवून नंतर बेधडक कारवाई केली.