सांगली : पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीला चकवा देत सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून देत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडीच्या पठारावर शुक्रवारी पहाटे पार पडल्या. गेल्या तीन दिवसापासून पोलिसांनी ९ गावांमध्ये संचारबंदी आदेश लागू करूनही अखेर आंदोलक शर्यती घेण्यात यशस्वी ठरल्याने प्रशासनाची उणीव समोर आली. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू कराव्यात या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असतानाच गेल्या आठवड्यामध्ये आ. पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून राज्यभरातील शौकिनांना झरे येथील मैदानावर येण्याचे आमंत्रण दिले होते. या पाश्र्वाभूमीवर प्रशासनाने झरेसह आसपासच्या ९ गावामध्ये १८ ऑगस्टपासून संचारबंदी लागू केली होती. गावात प्रवेश रोखण्यात आला होता, तर मार्गावर पोलीस पहारे ठेवून नाकाबंदीही केली होती. यासाठी सुमारे ३५० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. बैलगाडा शर्यतीसाठीची तीन मैदाने ताब्यात घेऊन पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने चरीही पाडल्या होत्या. तरीही झरे गावच्या शिवेवर असलेल्या वाक्षेवाडीच्या पठारावर सूर्योदयापूर्वीच शर्यती पार पडल्या. यासाठी एका रात्रीत पर्यायी मैदान तयार करण्यात आले. या शर्यतीसाठी हजारो शौकिनांची उपस्थिती होती. कोणत्याही स्थितीत शर्यती रोखण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र रात्री आ. पडळकर यांच्यासह आ. जयकुमार गोरे, आ. सदाभाऊ खोत यांनी चर्चा करून मध्यरात्री पर्यायी जागेची निश्चिाती करून कार्यकर्त्यांना तसा संदेश दिला. सूर्योदयापूर्वीच शर्यती पार पाडण्यात आल्या. हाच संदेश राज्यभर घेऊन आपण आंदोलन करणार असल्याचे आ. पडळकर यांनी सांगितले. दरम्यान, बंदी आदेश मोडून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्या प्रकरणी आयोजकासह प्रत्यक्ष शर्यतीमध्ये सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सायंकाळी सांगण्यात आले.