देशातील काही राज्यांनी फुलपाखरू उद्यानांसाठी हालचाली सुरू केल्या असल्या, तरी इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन)च्या कडक नियमावलीमुळे उद्यानांचे प्रस्ताव अमलात आणणे अशक्यप्राय आहे. महाराष्ट्रात रामटेक येथील राखीव जंगलावर फुलपाखरू उद्यान उभारण्याचा प्रस्ताव फुलपाखरू अभ्यासक डॉ. आशीष डी. टिपले यांनी मांडला आहे. रामटेकला फुलपाखरू उद्यान झाल्यास हा मध्य भारतातील ‘हॉट स्पॉट’ ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे.
परागसिंचनातील महत्त्वाचा घटक असलेल्या फुलपाखरांना कायम अधिवास मिळवून देणारे फुलपाखरू उद्यान उभारण्यात आययूसीएनची नियमावली सर्वात मोठा अडथळा बनली आहे. आययूसीएनच्या कठोर नियमांचे पालन अनिवार्य असल्याने देशातील बहुतांश राज्यांनी प्रयत्न सोडून दिले आहेत. एकटय़ा बंगलोरमध्ये फुलपाखरू उद्यान अतिशय चांगल्या पद्धतीने चालविले जात असून अन्य कुठेही फुलपाखरू उद्यान नाही. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या साडेतीनशे प्रजाती आढळत असताना राज्य सरकारने बटरफ्लाय पार्क उभारणीचे प्रस्ताव फारसे गांभीर्याने घेतलेले नाहीत. पिंपरी चिंचवडमधील महापालिकेचा बटरफ्लाय पार्क पुरेशा देखरेखीअभावी अपयशी ठरलेला आहे.
नागपुरातील रामटेकमध्ये बटरफ्लाय पार्कचा प्रस्ताव असला तरी प्रकल्पाचे ‘रोल मॉडेल’ अद्याप तयार नाही आणि तो नेमका चालवायचा कसा, याविषयी महाराष्ट्र सरकार अनभिज्ञ असल्याने त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. परंतु, डॉ. विलास टिपले यांनी फुलपाखरू उद्यानाची उभारणी, देखभाल आणि खर्च याबाबत अभ्यासपूर्ण तक्ते तयार केले असून, त्यानुसार अंमलबजावणी केल्यास कमी खर्चात अतिशय चांगले फुलपाखरू उद्यान रामटेकला चालविले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.  
विदर्भात फुलपाखरांच्या १६७ प्रजाती असून त्यापैकी १४ प्रजातींना वन्यजीव कायदा १९७२चे संरक्षण मिळाले आहे. यापैकी काही प्रजाती कित्येक वर्षांत विदर्भात दिसून आलेल्या नाहीत. याची प्रमुख कारणे वातावरणातील मोठय़ा बदलांचा परिणाम आणि वाढते शहरीकरण हीदेखील आहेत. गेल्या दहा वर्षांत शहराचा चारही बाजूंनी अवाढव्य विकास झाला आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याने फुलपाखरांचे नैसर्गिक अधिवास संपुष्टात आले आहेत. शहरीकरणाने फुलपाखरांच्या प्रजातींवर विपरीत परिणाम झाला आहे, असा निकष डॉ. विलास टिपले यांनी संशोधनातून काढला आहे.
इंटरनॅशनल युनियन फॉर कंझर्वेशन ऑफ नेचर (आययूसीएन)च्या नियमावलीनुसार फुलझाडांवर जाळी टाकून फुलपाखरांचे प्रजनन करणे नियमाविरुद्ध असल्याने ही जाळी लावता येत नाहीत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानेही तसे निर्देश जारी केलेले आहेत. परिणामी फुलपाखरू उद्यानांचे प्रस्ताव मंजूर करून घेणे कठीण झाले आहे.
जाळी नसलेल्या उद्यानांची कितीही काळजी घेतली तरी पक्ष्यांचे थवे फुलपाखरांच्या अळ्या खाण्यासाठी मोठय़ा संख्येने येऊ लागतात आणि त्यातून नवीनच समस्या उद्भवत असल्याने फुलपाखरू उद्यानांच्या मुद्दय़ावर सर्वच राज्य सरकारांची कोंडी झाली आहे. हा प्रकार एकदा आसामच्या नुमलीगड रिफायनरी टाऊनशिपमध्ये घडलेला आहे.
फुलझाडांवर नांदणारे छोटेसे फुलपाखरू शेकडो मैल अंतरापर्यंत उडण्याची क्षमता ठेवते. परागसिंचनातील फुलपाखरांची भूमिका पर्यावरणीय संतुलनात अत्यंत महत्त्वाची आहे. विशिष्ट हंगामातच फुलपाखरांचे प्रजनन होऊन अळ्यांची फुलपाखरे बनतात. त्यामुळे ही उद्याने विशिष्ट हंगामातच खुली ठेवावी लागणार आहेत. महाराष्ट्रात साधारण पावसाळ्याच्या हंगामात फुलपाखरांची पैदास मोठय़ा संख्येने होते. या फुलपाखरांना मुलांनी मारू नये, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व भावी पिढीने जोपासावे, यादृष्टीने महाराष्ट्रातही एखादा बटरफ्लाय पार्क उभारण्याची गरज आहे.
भारतात फुलपाखरांच्या सुमारे दीड हजार प्रजाती अस्तित्वात असून फुलपाखरांच्या आश्चर्यकारक दुनियेबद्दल आकर्षण वाटणारा मोठा पर्यटकवर्ग खेचण्यासाठी फक्त आसाम, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश या तीनच राज्यांनी फुलपाखरू उद्यान (बटरफ्लाय पार्क) उभारण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत. फुलपाखरांना नांदण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या फुलझाडांची लागवड करून त्यांची जोपासना करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.