हिंदी चित्रपटामधून अलिबागची होणारी बदनामी थांबवण्याकरिता आता अलिबागकर पुढे सरसावले आहेत.  २२ डिसेंबरपासून अलिबाग अस्मिता अभियानाची सुरुवात केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष नमिता नाईक यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून हिंदी चित्रपटांमधून अलिबाग शहराची नाहक बदनामी केली जात असल्याचे दिसून आले आहे. नुकत्याच प्रदशिर्त झालेल्या अमिर खानच्या ‘तलाश’ चित्रपटातूनही हा अलिबागच्या बदनामीचा ट्रेंड कायम राहिला आहे. त्यामुळे ऐतिहासिक धरोहर असणाऱ्या या शहराची प्रतिमा जगभरातील लोकांसमोर मलिन केली जात आहे. चित्रपट निर्मात्याकडून सातत्याने होणाऱ्या या बदनामीला आता आळा घालण्याचा निर्णय अलिबागकरांनी घेतला आहे. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज अलिबाग नगर परिषदेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत येत्या २२ डिसेंबरपासून अलिबाग अस्मिता अभियान सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अलिबाग अस्मिता अभियानातून अलिबाग तालुक्यातील लोकांना या प्रश्नावर एकत्र करण्याचे काम केले जाणार आहे. यानंतर ‘तलाश’ चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तर या प्रश्नावर सेन्सॉर बोर्डालाही कोर्टात खेचण्याची तयारी केली असल्याचे नमिता नाईक यांनी स्पष्ट केले आहे. अलिबाग हे एक टुमदार पर्यटनस्थळ आहे. त्याचबरोबर या शहराला कान्होजी राजे आंग्रेंचा वारसा लाभला आहे. शहरासंबंधीच्या चांगल्या बाजू हिंदी चित्रपटांमधून कधीच दाखवल्या गेलेल्या नाही. उलट शहराची नाहक बदनामी मात्र नेहमी केली जाते. यापुढे अशी बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.